उत्तर प्रदेशातील योगी सरकार त्यांच्या राज्यापुरता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या तयारीत आहेत याच मुद्द्यावरून आजच्या सामना अग्रलेखात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे. योगींनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लावलाच तर भाजपचे 160 आमदार बाद होतील, असं म्हणत खासदार रवी किशन हे लोकसभेत लोकसंख्या नियंत्रणाचे खासगी विधेयक मांडून चर्चा घडवणार आहेत, आता काय करायचं? असा तोल सुद्धा त्यांनी अग्रलेखातून लगावला आहे.
उत्तर प्रदेशातील योगी सरकार त्यांच्या राज्यापुरता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणत आहे. त्यामुळे राजकीय गहजब माजला आहे. राममंदिराचा विषय मार्गी लागला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राममंदिरावर मते मागता येणार नाहीत. लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणून हिंदू-मुसलमान असे विभाजन करण्याचा हा नवा प्रयोग असल्याचं बोललं जात आहे, असं राऊत म्हणालेत.
उत्तर प्रदेशात योगी सरकार लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा करत आहे. त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहायला हवे. प्रत्येक चांगल्या गोष्टीत धर्म, जात आणि राजकारणाचा कोलदांडा घातलाच पाहिजे असे नाही, असं म्हणत राऊतांनी योगींनी लोकसंख्या नियंत्रण कायद्याचं स्वागत केलं आहे. आता या अग्रलेखावर भाजपा काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.