अभिनेता शाहरुख खान याचा पुत्र आर्यन खान अटकप्रकरणी सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी होईल असे गंभीर आणि खळबळजनक आरोप लगावले आहेत. याच मुद्दयावरून आता क्रांती रेडकर आणि बहीण जस्मिन वानखेडे यांची होत असलेल्या बदनामीवरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“महाविकास आघाडीमधील मंत्री नवाब मलिक हे एका महिलेची कौटुबीक विषयाबाबतची बदनामी करताना दिसत आहेत. ते काझी म्हणतायत की त्यांच्याजवळ असलेली कादगपत्रे खरी आहेत. त्याची शाहनिशा न्यायालयीन प्रक्रियेमधून होऊ शकते. परंतु अशा पद्धतीनं महिलेच्या वैयक्तिक आयुष्याचा माध्यमांसमोर बाजार मांडण्याचा अधिकार नबाव मलिक यांना कोणी दिला,” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
“एका ट्वीटवरून गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्रीदेखील उघडपणे महिलेची होत असलेली वैयक्तिक बदनामी ऐकताना पाहतानादेखील गप्प कसे काय? यावरू एक गोष्ट सिद्ध होते, ज्या काँग्रेसी प्रवृत्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणूकीत पराभव केला होता, ती काँग्रेसी प्रवृत्ती जेव्हा सत्तेवर येते तेव्हा दलित आणि शोषितांवर अन्याय झालेला पाहायला मिळतो,” असंही त्या म्हणाल्या.