अहमदनगर : ‘न्यायालयाने निर्णय द्यायचा नाही, मग काय यांची दादागिरी चालणार का?, असा सवाल करतच कोण संजय राऊत?’ असा खोचक टोला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
संजय राऊतांची दादागिरी कुठेही चालणार का? – चंद्रकांत पाटील
आरे मेट्रो कारशेड कांजूरमध्ये स्थलांतरित केल्यानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती मिळाल्यानंतर भाजपने तर सरकारला कोंडीत पकडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे.
भाजप नेते आणि न्यायालयाच्या निर्णयावर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. मेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षानं राजकीय केला आहे. त्यात न्यायालयाने पडू नये आणि ते योग्य आहे, असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. राऊतांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपचे नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनीही राऊतांच्या त्या वादग्रस्त विधानावर हल्लाबोल केला आहे.
‘घटनेच्या चौकटीतील गोष्टी मानव्या लागतील. एखाद्या घटनेसंदर्भात न्यायालयात जायचे नाही का? यांना निवडणूक आयोग आणि कोर्टाचे निर्णय मान्य नाहीत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरु आहे आणि पुढेही सुरू राहिल. हे सर्व तुम्हाला मान्य नाही का?,’ असा बोचरा सवालही त्यांनी केला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
न्यायालय हल्ली कशातही पडत आहे. खालच्या न्यायालयाला डावलून एका खुनी माणसाला वरचं न्यायालय जामीन देते. बेकायदा बांधकाम तोडण्यासंदर्भात कारवाई केली तर सरकारलाच बेकायदेशीर ठरवतात. देशाच्या न्यायव्यवस्थेला आम्ही असं कधी पाहिलं नव्हतं, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.