कोल्हापुरातील निकालांनंतर हिमालयात जाणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात, “मी असं म्हटलं होतं की…!”
यंदाच्या कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशा आमने-सामने झालेल्या लढतीसोबतच जोरदार चर्चा होती ती चंद्रकांत पाटील यांच्या आव्हानाची! “कोल्हापुरातून निवडणूक हरल्यास राजकारण सोडून हिमालयात जाईन”, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर उत्तरमधील निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर पाटलांच्या त्याच विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यावर खुद्द चंद्रकांच पाटील यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
“दादा, हिमालयात जावा…”
कोल्हापुरात प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हिमालयाच्या मुद्द्यावरच चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. दोनच दिवसांपूर्वी इथल्या मंगळवार पेठेत चंद्रकांत पाटील प्रचारासाठी पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोषण करण्यात आला. ‘दादा हिमालयात जावा’ अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा हा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी समर्थकांसोबत तिथून काढता पाय घेतला होता.