औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारांच्या गावात कोरोना चाचण्यांवर भर देणार; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार ग्रामीण भागात वाढत आहे. या प्रसाराच्या अटकावा करिता जिल्ह्यात 13 बाजारांच्या गावात तत्काळ कोरोना चाचणी करण्यात येणार असून, या चाचणीमुळे निश्चितच कोरोना विषाणुच्या प्रसारास आळा बसेल, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात दर सोमवारी लोकप्रतिनिधी समवेत कोरोना आढावा बैठक घेण्यात येते यावेळी ते बोलत होते. बैठकीला खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आमदार अतुल सावे, आ. अंबादास दानवे, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार आदीची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी म्हणाले : कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागात मोठया प्रमाणात पसरत असून जिल्हृयातील 13 बाजार भरणाऱ्या गावात कोरोना तपासणी केल्याने कोरोना विषाणुच्या प्रसारास प्रतिबंध होईल. शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना रोख स्वरुपातील दंडासह मास्क देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 6 हजार 302, तर शहरात 13 हजार 847 रुग्ण आहे. तर जिल्ह्यात एकुण 21 हजार 149 कोरोना बाधित रुग्ण आहेत तर 74.03% रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.