‘औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत’ – सामनामधून साधला निशाणा
औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत, असं म्हणत शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आज काँग्रेसला चिमटे काढलेत. आपल्या रोखठोक या साप्ताहिक सदरातल्या लेखाला त्यांनी औरंगजेब कोणाला प्रिय, हे वागणं सेक्युलर नव्हे, असं शीर्षक देत नामांतराबद्दल आपली भूमिका मांडलीय.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजतोय. औरंगाबादचं नाव तेच ठेवायचं की संभाजीनगर करायचं हा या वादाचा मूळ मुद्दा आहे. पण महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने शिवसेनेच्या या मागणीला कडाडून विरोध केलाय. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी रोखठोक हे सदर लिहिलंय.
ते आपल्या सदरात लिहितात, ‘मराठवाड्यातील सरकारी कागदोपत्री औरंगाबाद नामे असलेल्या शहराचं नामकरण संभाजीनगर व्हावं यावरून राजकीय वाद निर्माण झालाय. काँग्रेससारखे सेक्यूलर पक्ष औरंगाबादचे संभाजीनगर होऊ नये या मताचे आहेत. औरंगाबादचे नामांतर केल्यानं मुसलमान समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील आणि मत बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वतःच्या सेक्यूलर प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.’ असं म्हणत संजय राऊत यांनी पुढे काँग्रेसच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेत.
संजय राऊत पुढे लिहितात, ‘महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके तरी नजरेखालून घालायला हवीत. औरंगजेब हा ‘सेक्युलर’ वगैरे कधीच नव्हता. त्याला इस्लाम धर्माधिष्ठत राज्यविस्तार करायचा होता. माझ्या राज्यात लाचलुचपत म्हणजे भ्रष्टाचार चालणार नाही असे तो बरळत असे, पण स्वतः औरंगजेब हा पैसे घेऊन पदव्या आणि सरदारक्या बहाल करीत असे.
औरंगजेबाची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला. त्याने धर्माचेच राजकारण केले. जे मुसलमान नाहीत अशा काफीर लोकांना मारण्याकरिता जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्या विरुद्ध नाही असे औरंगजेब मानी आणि तो ते अमलात आणी.’
संजय राऊत आपल्या सदराच्या शेवटी लिहितात, ‘औरंगजेबाच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने शिवाजीराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजींना हाल हाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही २५ वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला आणि शेवटी याच मातीत गाडला गेला.
अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्मांधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाहीतर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं ‘सेक्युलर’ नव्हे.’