पार्सल कोल्हापूरवरून आलं काय किंवा सांगलीवरून आलं काय, ते व्हाया पुणेच दिल्लीला जातं
राज्यभर पदवीधर निवडणुकीचा धुराळा उडत आहे. पदवीधर मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता प्रचाराची सुरुवात झाली आहे. पुण्यात भाजपने संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आय़ोजित केला होता. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाल.
पुण्याची गोडी एवढी आहे की चंद्रकांतदादा कोल्हापूरसोडून आता पुण्यातच राहायला आले आहेत’ अशी खासदार गिरीश बापट यांनी केलेली टोलेबाजी.. तर विरोधी पक्षातील नाराज उमेदवारांना कसे जवळ करायाचे आणि त्यांना फूटाणे खाऊन घालून काम करून घ्यायचे, हे बापट यांना चांगले जमते,,’ अशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी केलेली कोटी यावरून भाऊ आणि दादा यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याच पाहायला मिळालं.
पदवीधर मतदार संघातील पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बापट यांनी चौफेर टोलेबाजी केली. कोल्हापूरची चप्पल, सोलापूरची चादर, सांगलीचे भडंग, सातारचे कंदी पेढे प्रसिद्ध आहेत, पुण्याचे काय? असा प्रश्न उपस्थित करून बापट म्हणाले पुणेकर मुळातच तयारीचे आहेत.
पार्सल कोल्हापूरवरून आले काय, की सांगलीवरून, ते व्हाया पुणेच दिल्लीला जाते.” पुण्याची गोडी अधिक असल्याने चंद्रकांतदादा पुण्यात आले. त्यांनी महात्मा सोसायटीत जसा बंगला घेतला, तसा तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्हालाही कोथरूड परिसरात बंगला पाहून देऊ, असे संग्राम देशमुखांकडे पाहत बापट म्हणताच हसा उसळला.