जेंव्हा अभिनेते आमिर खान भलत्याच घरात घुसतात तेंव्हा…!
मुंबई : प्रख्यात सिने अभिनेता आमिर खान गुरूवारी मलबार हिलवरील भलत्याच घरात घुसला. आपण चुकीच्या ठिकाणी आलोय हे लक्षात आल्यानंतर त्याने सर्वांना नमस्कार केला. त्याला ज्या घरात जायचे होते त्याचा पत्ता विचारून घेतला आणि तो त्याला हव्या त्या घरात शांतपणे निघून गेला…!
त्याच्या स्वतःच्याच ‘पिके’ चित्रपटातील ‘ये रॉंग नंबर हैं’ हा डायलॉग चांगलाच गाजला होता. पण खुद्द आमिर खानच्याच या ‘रॉंग नंबर’ची नंतर बराच वेळ चर्चा रंगली. गुरूवारी सकाळी आमिर खान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मलबार हिलवरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी येणार होता. फडणवीस यांच्या बंगल्याचे नाव ‘सागर’ असून, त्यांच्या शेजारी माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे ‘मेघदूत’ हे शासकीय निवासस्थान आहे. नियोजित भेटीसाठी फडणवीस यांच्या निवासस्थानी जाण्याऐवजी आमिर खानच्या वाहनांचा ताफा चुकून थेट अशोक चव्हाण यांच्या बंगल्यात शिरला.
कोणी व्हीआयपी येणार असल्याची माहिती नसताना अचानक वाहनांचा ताफा आणि अनेक सुरक्षा कर्मचारी बंगल्यात शिरल्याने तिथे उपस्थित असलेले कर्मचारी लगेच बाहेर आले. त्या ताफ्यातील पहिल्या वाहनातून खुद्द आमिर खान उतरला व तो घराच्या थेट मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील खुर्चीवर बसून बुटही काढू लागल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
त्यावेळी अशोक चव्हाण बंगल्यावर उपस्थित नव्हते. शिवाय आमिर खान येणार अशी कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे सारेच कर्मचारी बुचकळ्यात पडले. शेवटी चव्हाण यांचे माध्यम समन्वयक अभिजित देशमुख यांनी आमिर खान यांचे स्वागत केले. आपण अशोक चव्हाण यांना भेटायला आलात का? अशी विचारणा केली. त्यावेळी आमिर खानच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव उमटले. त्याने लगेच आपण फडणवीस यांच्या भेटीसाठी आल्याचे सांगितले.
परंतु, हे निवासस्थान फडणविसांचे नसून, चव्हाणांचे असल्याचे कळाल्यावर आमिर खान यांच्या सहकाऱ्यांना आपला ‘रॉंग नंबर’ ने भलत्याच घरात आल्याचे लक्षात आले. परंतु, आमिर खानने विनम्र शैलीत अशोक चव्हाण यांची चौकशी केली व ते घरी नसल्याने त्यांना आपला नमस्कार कळवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी पुन्हा बूट घातले व सगळ्यांना हात दाखवत अशोक चव्हाण यांचे निवासस्थान सोडले. मात्र काही काळ काँग्रेसच्या मंत्र्यांना हिंदी सिने अभिनेते आता भाजपाचा उंबरा सोडून आपल्याकडे येत आहेत याचे क्षणिक समाधान मिळाले… हे ही नसे थोडके…!
साभार लोकमत चे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या फेसबुक वॉलवरून साभार
Lokmat