मुख्यमंत्र्यांना भेटून काय उपयोग, राज्य शरद पवार चालवतात – चंद्रकांत पाटील
राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग सध्या राज्य शरद पवार चालवत आहे. त्यामुळे पवारांनाच भेटलं पाहिजे. शिवाय, मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्यपाल आणि शरद पवार हेच भेटीसाठी जास्त उपलब्ध असतात असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. ते सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेतील काही नेत्यांनी त्यांना ऑफरही दिली होती. पंकजा यांनी दसरा मेळाव्याच्या सभेत भूमिका स्पष्ट केली असली तरी चर्चा सुरूच आहेत. त्यातच पंकजा यांनी नुकतंच शरद पवारांचं कौतुक केलं होतं. त्यामुळं उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं.
चंद्रकांत पाटील यांना त्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, ‘पंकजा मुंडेंनी शरद पवारांचे कौतुक केले ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत. मात्र, शरद पवार बाहेर पडतात याचं कौतुक आहे. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. जयंत पाटील यांनीही सांगलीत भाजपच्या नेत्यांचे कौतुक केले आहे.’