नैवेद्य म्हणजे काय….? नैवेद्याचे प्रकार आणि दाखवण्याचे पद्धती
देवाला “निवेदनीय” असे जे द्रव्य ते द्रव्य म्हणजे नैवेद्य होय.
आपण जे काही करू, जे काही खाऊ त्यातला पहिला भाग आधी अत्यंत भक्तिभावाने देवाला अर्पण करायचा, ही सर्वसामान्य भावना असते. देव येऊन त्यातलं काहीच खाणार नाही, नंतर आपणच ते संपवायचं आहे, हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण वास्तवापेक्षा कधीकधी श्रद्धा जास्त मोठी ठरते.
आणि देवाला दाखवलेला नैवेद्य प्रसाद म्हणून सगळ्यांच्या हातात पडतो. भक्ताच्या भावनेनुसार नैवेद्यात वैविध्य येत जातं. घरच्या सगळ्यांचं पोट भरून उरलेलं वाटीभर दूध भक्तिभावाने शंकराला वाहणाऱ्या श्रावणातल्या सोमवारी सांगितल्या जाणाऱ्या म्हाताऱ्या आजीच्या कथेतल्या दुधापासून ते देवाला चढवल्या जाणाऱ्या ‘भोग’पर्यंत नैवेद्यात काहीही असू शकतं.
संस्कृतीच्या एका विकसित टप्प्यावर आल्यावर नैवेद्याला काय आहे, यापेक्षा त्यातला भक्तिभाव महत्त्वाचा, अशी धारणा दृढ होत गेली. पण सहज जाता जाता एक संदर्भ द्यायला हरकत नाही. इतिहासाचार्य राजवाडे यांचं ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ हे मानव टोळी अवस्थेत जगत होता, तेव्हापासून विवाहसंस्था आजच्या टप्प्यावर येऊन पोहोचण्याच्या काळात कोणकोणती स्थित्यंतरं झालेली असू शकतात, याची मांडणी या पुस्तकात आहे.
त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की देव ही एक अत्यंत प्रबळ अशी जमात त्या काळात होती. या जमातीशी दोन हात करणं इतरांना शक्य नव्हतं. ही जमात येऊन लुटालूट करून असेल नसेल ते सगळं घेऊन जात असे. हे टाळण्यासाठी बाबांनो तुम्ही आम्हाला लुटू नको, पण आम्ही जे काही पिकवलं असेल त्यातला वाटा आम्ही तुम्हाला देतो, अशी पद्धत सुरू झाली. आपल्याकडे जे असेल त्यातला वाटा आधी या देवांना द्यायचा, या सवयीचा इतका पगडा बसला की नंतर त्या व्यवस्थेचं उदात्तीकरण देवांना नैवेद्य दाखवणं या प्रथेत झालं. अर्थात इतिहासाचार्य राजवाडे यांनी ही एक शक्यता मांडली आहे.
आधी नैवेद्य म्हणून दाखवलेला पदार्थ नंतर प्रसाद होऊन आपल्या हातात येतो. या प्रसादाचं पहिलं रूप म्हणजे पंचामृत. दही, दूध, तूप, मध आणि साखर घालून केलेलं पंचामृत चवीला चांगलं लागतंच शिवाय पौष्टिकही असतं. त्यात केळं कुस्करून घालणं हा पंचामृताचा आणखी एक प्रकार. डाव्या हाताच्या पंज्यावर उजव्या हाताचा पंचा उलटा ठेवून मधल्या खळग्यामध्ये पंचामृत घेऊन ते पिऊन नंतर न चुकता तो हात भक्तिभावाने डोक्यावरून फिरवताना मंडळी दिसतात.
काहीजणांकडे हे पंचामृत रोजच्या रोज नैवेद्य दाखवलं जातं, तर काहीजणांकडे सत्यनारायणाच्या पूजेला. साहजिकच पंचामृत घेतलं की पुन्हा हात पुढे होतो तो सत्यनारायणाच्या प्रसादाला. सगळे घटक सव्वाच्या पटीत घेऊन केलेला सत्यनारायणाचा शिरा कमालीचा चविष्ट लागतो. खरं तर सत्यनारायण अशी काही पारंपरिक देवता नाही. इतर देवांसारखं तिचं सांस्कृतिक उगमस्थान, त्यामागच्या शेकडो वर्षांची परंपरा सांगणाऱ्या व्युत्पत्तीकथा नाहीत. पण प्रसादाच्या शिऱ्यासाठी अनेकांचे हात सत्यनारायणाला आपोआप जोडले जातात.
नैवेद्याचं ताट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं, ते केळीचं हिरवंगार पान. त्यावर मधोमध पांढरीशुभ्र भाताची मूद. त्यावर पिवळंधमक वरण. डावीकडे खोबऱ्याची चटणी, एखादी कोशिंबिर, तळणाचा एखादा पदार्थ, सहसा शेवयांची किंवा गव्हल्यांची खीर, उजवीकडे पुन्हा पिवळी धमक बटाटय़ाची भाजी, वाटीत एखादं सार, एकावर एक रचलेल्या दोनचार पुऱ्या, त्या दिवसासाठी केलेला खास गोडाचा पदार्थ.. हिरव्यागार केळीच्या पानात हे सगळे पदार्थ इतकी सुंदर रंगसंगती साधतात की बघतच राहावं. हा सगळा नैवेद्य देवाला दाखवल्यानंतर घरातल्या सगळ्यात लहानग्याला कौतुकाने ते ताट दिलं जातं आणि वर प्रसादाचं ताट आहे, त्यातलं काहीही टाकायचं नाही अशी तंबीही दिली जाते.
त्याशिवाय काही सणांनुसारचे नैवेद्य असतात. म्हणजे श्रावणात पुरणावरणाचा नैवेद्य झाल्याशिवाय गृहिणीला चैन पडत नाही. गणपतीत नैवेद्याला मोदक हवाच, मग तो उकडीचा असेल, तळलेला असेल किंवा दुकानात मिळणारा खव्याचा रेडीमेड असेल. पण तेच गौरीजेवणाचा नैवेद्य वेगळा. त्यात तर जातींनुसार वैविध्य आहे, प्रादेशिक वैविध्य आहे. काही जातींमध्ये गौरीला मटणाचा आणि दारूचा नैवेद्य असतो. आणि तिला काय नैवेद्य दाखवला आहे, तो गणपतीने बघू नये म्हणून त्या दिवसापुरता गौरीगणपतीमध्ये चक्क पडदा लावलेला असतो. गणपती विसर्जनाच्या वेळी त्याचा निरोप घेताना काही ठिकाणी दहीभाताचा नैवेद्य असतो.
गोकुळाष्टमीला केला जाणारा गोपाळकाला हा चविष्ट प्रकार म्हणजे कृष्णजन्माचा नैवेद्य दाखवून दिला जाणारा प्रसादच. तर रामजन्माचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या सुंठवडय़ाची चव नंतरही बराच वेळ जिभेवर रेंगाळत राहते.
हनुमान हा संसाराबिंसारापासून लांब असलेला ब्रह्मचारी देव. त्यामुळे त्याच्या जन्मावेळी फार सोपस्कार नसतात.
टरबुजासारख्या फळाचा नैवेद्य त्याला सहज चालतो.
वेगवेगळ्या नैवेद्यांमध्ये चविष्ट आणि पुन:पुन्हा मागून खावासा वाटणारा नैवेद्य चैत्रगौरीचा. कैरीची डाळ आणि थंडगार पन्ह्य़ाचा. हरभऱ्याची डाळ भिजवून भरडसर वाटून तिच्यात किसलेली कैरी, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ किंचित चवीपुरती साखर घालून खमंग फोडणी दिली की झाली कैरीची डाळ तयार. कुणी तिला आंबेडाळही म्हणतं. ही आंबटतिखट डाळ आणि तिच्यासोबत किंचित आंबटगोड चवीचं पण मधुर आणि थंडगार पन्हं मिळतं म्हणून बच्चेकंपनी आईबरोबर कितीही घरांना भेटी द्यायला एका पायावर तयार असते.
प्रसाद म्हणून एरवी देवळांमध्ये एखादा साखरफुटाणा, खोबऱ्याचे काप, बत्तासा, चुरमुरे, साळीच्या लाह्य़ा, पेढय़ांचा चुरा असे प्रकार मिळतात. शिखांच्या गुरूद्वारात तर प्रसाद म्हणून लंगर म्हणजे अत्यंत उत्तम असं जेवणच असतं. बरेच ट्रेकर्स उत्तराखंडमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक करायला जातात. तिथून पुढे समुद्रसपाटीपासून १५ हजार फूट उंचीवर हेमकुंड हे शिखांचं धर्मस्थळ आहे. सतत कमालीची थंडी असलेल्या हेमकुंडला गुरूद्वारामध्ये प्रसाद म्हणून खाता नव्हे तर पिता येईल अशी पातळ गरमगरम मुगाची खिचडी आणि अप्रतिम चहा मिळतो. त्या थंडीत हे दोन पदार्थ स्वर्गसुखाचीच जाणीव करून देतात.
म्हणजे ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी, त्याला देता येण्यासारखी खाद्य वस्तू, खाद्य पदार्थ म्हणजे नैवेद्य असे आपण म्हणू या.
तंत्रसार या ग्रंथात पुढे दिल्याप्रमाणे नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा किंवा असू शकतो.
त्यात म्हंटले आहे की “जे निवेदनीय असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे. ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे. त्यालाच “नैवेद्य” म्हणतात.
1) भक्ष्य- गिळता येण्यासारखे,
2) भोज्य- चावून खाता येईल असे,
3) लेह्य- चाटता येईल असे,
4) पेय- पिता येईल असे आणि
5) चुष्य- चोखता येईल …..
असे ते पाच प्रकार आहेत.
असा हा पंचविध नैवेद्य देवाची पूजा करून त्याला समर्पावा.” तंत्रासारातील मूळ श्लोक पुढील प्रमाणे-
निवेदनीय यद द्रव्यं, प्रशस्तं प्रयतं तथा |
तद भक्ष्यार्हम पंचविधं नैवेद्यमिति कथ्यते |
भक्ष्यं, भोज्यं च लेह्यं च, पेयं चुष्यं च पंचमम |
सर्वत्र चैतनैवेद्यमाराध्यास्यै निवेदयेत ||
विष्णूला दुधभात, शिवाला दहीभात,
गणपतीला मोदक अथवा गूळखोबरे, सूर्याला गूळभात आणि
देवीला सांजा तिखट सांजा नाही. गोडाचा सांजा म्हणजेच शिरा. – पहा सांज्याच्या साटोऱ्या किंवा श्रीखंड प्रिय आहे. दुध आणि फळे सर्व देवांना प्रिय आहेत.
नैवेद्य दाखवताना देवापुढे चौकोनी मंडळ करून त्यात पुन्हा X असे चिन्ह करून मग त्याच्या वर नैवेद्याचे ताट, भांडे, पात्र ठेऊन मग नैवेद्य दाखवावा. या पात्रावर तुलसीपत्र ठेऊन मगच तो नैवेद्य देवाला अर्पण करावा.
तुलसीपत्र ठेवले की माझा यावरचा अधिकार संपला आहे आणि आता हे पूर्णत: तुझे आहे हा भाव व्यक्त होतो आणि आपला अधिकार संपतो.
सोने, रूपे, तांबे, दगड, कमलपत्र आणि यज्ञीय लाकूड यापैकी एका पात्रात ठेऊन नैवेद्य दाखवावा असे सांगितले गेलेले आहे.
नैवेद्य देवाच्या उजव्या हाताला ठेवावा. डाव्या हाताला ठेवल्यास तो अभक्ष्य म्हणजे खाण्यास अयोग्य होतो. तुलसीपत्र, दुर्वा किंवा पुष्प यांनी नैवेद्याचे प्रोक्षण करावे.
म्हणजे यांनी नैवेद्यावर पाणी शिंपडावे म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास, अर्पण करण्यास योग्य होतो.मग नैवेद्याचे पात्रा भोवती डावीकडून उजवी कडे असे आपल्या उजव्या हाताने पाणी सोडत मंडल करत यावे.
नंतर “प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा” असे म्हणत म्हणत नैवेद्याचा घास देवाच्या मुखाकडे न्यावा.
त्यावेळी आपला दावा हात आपल्या हृदया जवळ असावा, मान झुकलेली असावी. असे करून झाले की “मध्ये पानीयं समर्पयामि” असे म्हणून उदक द्यावे. म्हणजे पाणी द्यावे म्हणजे पाणी जवळ न्यावे अथवा ताम्हनात सोडावे.
मग पुन्हा वरचा हा स्वाहा मंत्र म्हणत म्हणत ज्या देवतेला तो नैवेद्य दाखवायचा असेल त्या देवतेचे नाव घेत { इथे विशिष्ट देवतेचे नाव घेत नसल्याने मी “अमुकदेवताभ्यो” म्हणत आहे} “अमुकदेवताभ्यो नम: नैवेद्यं समर्पयामि” असे म्हणावे आणि ताम्हनात उदक सोडावे.
[ उदक म्हणजे पाणी] महानैवेद्य हा पुरण, वरण, पक्वान्न, भाज्या, कोशिंबिरी इत्यादी षड्रस अन्नाचा असावा.
नैवेद्य दाखवून झाल्यावर देवाची आरती करावी.
नैवेद्य दाखवून झाला की जो पदार्थ असेल त्याचे “प्रसादात” रुपांतर होते.
त्यामुळे मी देवाला प्रसाद दाखवतो आहे असे म्हणता येत नाही तर मी देवाला नैवेद्य दाखवतो आणि तुला त्याचा “प्रसाद” देतो हे योग्य आहे.
देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण तो लगेच स्वत:ही खाऊ नये आणि इतरांना लगेच वाटू सुद्धा नये.
थोडावेळ तो देवापुढे तसाच ठेवा. हां, पण झुरळे, पाली, उंदीर, माशा, मुंग्या यांचा त्याला उपद्रव होत नाही ना हे पाहणे अगत्याचे आहे हे सांगायला नकोच.
आपल्याला जर प्रत्यक्ष नैवेद्य दाखवता येत नसेल तर आपण मानस पूजा करून त्यामध्ये आपल्याला हवा तो नैवेद्य प्रभूला अर्पण करू शकतो.
आणि या मानस पूजेमध्ये प्रचंड शक्ती आहे.
अगदी प्रत्यक्ष पूजेपेक्षाही. कारण आपण त्यावेळेला देवाशी पूर्णत: एकरूप होऊन जातो. मनाला प्रयत्न करून मानस पूजेचे चित्र रंगवावे लागते. आणि मनाला मग हळूहळू असा हा शांतीरूप आकार यायला लागतो. आणि मग आपले जीवनच पवित्र, सुगंधी बनून जाते.
आपला देह हा देवाचे मंदिर होतो आणि आत आत्मा परमेश्वर आहे हे कळायला लागते ………….