राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी रांजणी येथील प्रचारसभेत जोरदार फटकेबाजी केली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. आपलं सरकार आहे म्हणून गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिले.
तसेच बांग्लादेश स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय इंदिरा गांधींचे आहे, तिथेही आपण बांग्लादेश स्वतंत्र लढ्यात होतो असे सांगत आहेत. मागचा इतिहास पुसून आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, हे सतत सांगण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात आहे असा टोला जयंत पाटील यांनी यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला होता.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत, शेतकरी आज दिल्लीत आंदोलनाला बसले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्याला यावर बोलण्यास वेळ नाही. आज नोकरदारांच्या नोकऱ्या सुरक्षित नाही, तरुणांच्या हाताला काम देण्याची सरकारकडे कुवत तर नाहीच पण आहे त्या नोकरीवरही मोदी सरकारने टांगती तलवार ठेवली आहे, अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली.