मुंबई – राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. तर येणाऱ्या २ दिवसांत मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने दिला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
येत्या २ दिवसात मराठवाडाच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर गुरुवारी आणि शुक्रवारी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांमध्ये मुंबई, ठाणे सहीत भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाजही वेधशाळेने वर्तवला आहे.
मागील काही दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. मात्र, वातावरणात अचानक पणे बदल झाल्याने पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे. सोयाबीनसह अनेक पिकं ही काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
राज्यात झालेल्या सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापूस, भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडत असल्याने हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे किमान तापमानात चढउतार होत असून साताऱ्यातील महाबळेश्वर येथे १७ अंश सेल्सिअस सर्वात कमी तापमान नोंदविले गेले.