मुंबई मनपाला लुटणाऱ्या विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल – संदीप देशपांडे
विरप्पनने जेवढं लुटलं नसेल त्यापेक्षा कितीतरी पटीने सत्ताधाऱ्यांनी मुंबई महापालिकेला लुटलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असा हल्लाबोल मनसे नेते संदीप देशपांडे शिवसेनेवर टीका केली आहे.
मुंबई मनपा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय आरोपप्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेतल्या कारभारावरुन अनेक वेळा शिवसेनेला डिवचणाऱ्या संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा सेनेवर निशाण साधला.
मुंबई महापालिकेला लुटण्यासाठी विरप्पन गँग काम करत आहे. ही विरप्पन गँग महापालिकेला मोठ्याप्रमाणात लूटत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असं म्हणत देशपांडे यांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं.
रस्त्यांचा घोटाळा, नालेसफाईचा घोटाळा किंवा आता कोरोनाच्या काळातील घोटाळा असे किती तरी घोटाळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहेत. जनतेला जर यातून दिलासा द्यायचा असेल तर यांचा वध करावाच लागेल. यासाठी मनसे पुढाकार घेईन.
पालिकेतील सत्ताधारी हे त्यांच्याच लोकांना काम देत असून यात मोठी लूट आहे. या लूटीविरोधात मनसे आता सर्व पालिका निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. आज पुन्हा एकदा पक्षाची बैठक असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती देशपांडे यांनी दिली.