राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेत मोठे वादळ निर्माण झाल्यापासून तसेच शिवसेनेला गळती लागल्यानंतर हा संघर्ष आणखी वाढला असून मुद्द्यांची लढाई आता गुद्द्यांवर आली आहे. यातच काल शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्या प्रकरणी मुख्य आयोजक संभाजी थोरवे यांना अटक केली आहे. राजेश पळसकर,चंदन साळुंके,सूरज लोखंडे, रुपेश पवार यांनाही अटक केली असून एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बोलताना शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या हल्ल्याचं समर्थन केलं आहे. ही तर कार्यकर्त्यांची उत्सुफूर्त प्रतिक्रिया आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उदय सामंत यांच्यावरील हल्ला ही उत्सफूर्त प्रतिक्रिया आहे, असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे