उद्धव ठाकरे यांच्याकडे ना शिवसैनिक आहेत, ना प्रकाश आंबेडकरांकडे भीमसैनिक

 

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युतीच्या चर्चा होत असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर टिकत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या कितीही बैठका झाल्या, तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही, कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे ना शिवसैनिक आहेत, ना आंबेडकर यांच्याकडे भीमसैनिक, शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदे यांनाच मिळणार असा दावा आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला.

आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र आले, तरी फार परिणाम होणार नाही, कारण भीमशक्ती माझ्याकडे, तर शिवशक्ती एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. शिंदे यांच मोठं बंड आहे. शिवाय उद्धव ठाकरे, बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात जागा वाटपामध्ये मतभेद होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आघाडीचा काही उपयोग होणार नाही.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप 350 आणि एनडीए 450 खासदार निवडून येणार आहेत. सध्या भाजपने 144 जागांवर मोहीम सुरू केली आहे, त्यामध्ये आरपीआयला आम्ही जागा मागणार आहोत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमच्या पक्षाला जागा मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हे वर्ष छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त, 5 आणि 6 मे रोजी कोल्हापूरला आरपीआयचे अधिवेशन आयोजित केले आहे.

तसेच 6 तारखेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, मराठा आरक्षणाची मागणी मी सर्वप्रथम केली आहे, ओबीसीप्रमाणे त्यांना लाभ मिळावेत अशी मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी मागणी केली आहे. आम्ही सर्वसमावेशक होण्यास अपयशी ठरलो आहे, आता सर्वांना सोबत घेऊन पक्षबांधणी करणार असल्याचे आठवले म्हणाले.

Team Global News Marathi: