मुंबई: ना जीडीपी कळतो, ना अर्थव्यवस्था, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय.उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदावर बसण्याची लायकी नाही. त्यांना ना अर्थव्यवस्था कळते ना जीडीपी कळतो, अशा शब्दात आरे-तुरेची भाषा वापरत खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसऱ्या मेळाव्यात बोलताना नारायण राणे आणि कुटुंबावर जोरदार प्रहार केले होते. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला राणेंनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युतर दिलं.
मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून एकही काम यांनी नीट केलं नाही. यांना जीडीपी कळत नाही, अर्थव्यवस्था माहिती नाही. अधिकारी हसतात. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसला आहे. माझे सर्व शब्द त्यांना सांगा, असं राणे म्हणाले.
कुणाला दादागिरीची भाषा करता, कुणाला वाघाची भाषा करता? तुम्ही स्वत: शेळपट आहात. माझ्याकडे या शब्दाशिवाय दुसरा शब्द नाही तुमच्यासाठी. मराठी माणसासाठी शिवसेना आहे म्हणता मग मुख्यमंत्री झाल्यावर काय केलं तुम्ही त्यांच्यासाठी, असा प्रश्न राणेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.
‘हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा’ ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आव्हान
उद्धव ठाकरेंनी कालच्या भाषेसारखी परत जर भाषा वापरली तर आम्ही मातोश्रीची आतली आणि बाहेरची माहिती देऊ. ती त्यांना महागात पडेल. बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून अजून संयमाने गप्प बसलो आहे. आमच्याकडे नजर फिरवू नका. आम्ही नजर फिरवली तर कपडे सांभाळत पळता भुई थोडी होईल, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे पिंजऱ्यात होते. आत्ता कुठे एका दौऱ्याला ते बाहेर पडले. हे स्वतःला वाघ म्हणतात. हे पिंजऱ्यातील वाघ आहेत का? कालच्या सभेत केवळ 47 लोक टाळ्या वाजवायला होते. मी शिवसेनेत होतो, अनेक पदं भुषवली. बाळासाहेब ठाकरे यांनी मला अनेक पदं दिलं. मी बेडूक नव्हतो. हे बेडूक आहेत म्हणून त्यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं नाही. बाळासाहेब असते तर त्यांना मुख्यमंत्री केलं नसतं. ते जास्त बोलले तर 47 वर्षात जे केलं ते सर्व बाहेर काढेल, असंही राणे म्हणाले.