भाजपच्या बारा निलंबित आमदारांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क

भाजपच्या बारा निलंबित आमदारांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्यामुळे निलंबित केलेल्या भाजपच्या बारा आमदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी होणाऱया राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत बारा आमदारांना मतदान करता येईल. मात्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्यासाठी विधान भवनाच्या बाहेर व्यवस्था करण्यात येणार आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्दय़ावरून चर्चा सुरू असताना भाजपच्या आमदारांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जाऊन जोरदार घोषणाबाजी करीत प्रचंड गोंधळ घातला होता. एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला होता. राजदंडही उचलला होता. भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

यावरून गिरीश महाजन, जयकुमार रावल, डॉ. संजय कुटे, आशीष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर, हरीश पिंपळे, नारायण कुचे, पराग आळवणी, मितेश भांगडिया, राम सातपुते, अभिमन्यू पवार या भाजपच्या बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबित असल्याने नियमानुसार ते विधान भवन परिसरात प्रवेश करू शकत नाहीत.

या बारा आमदारांच्या मतदानाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला मागितला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत आदेश काढला आहे.

त्यामुळे या बारा आमदारांना राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत मतदार करता येईल. मात्र या बारा आमदारांना विधान भवनात प्रवेश करता येणार नाही. त्यांच्यासाठी विधान भवनाबाहेर मतदानासाठी व्यवस्था केली जाईल. त्यांच्या मतपेटीतील मतपत्रिका या अन्य मतपत्रिकांसोबत मिसळून मग मतमोजणी केली जाईल. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: