नवी दिल्ली 10 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेन्द्र मोदी रविवारी (11 ऑक्टोबर) ‘स्वामित्व’ योजना ची सुरुवात करणार आहेत. या योजनेत नागरिकांना त्यांच्या संपत्तीच्या मालकीचं कार्ड दिलं जाणार आहे. त्यामुळे बँकेतून कर्ज घेणं किंवा इतर कामांसाठी त्या कार्डचा उपयोग केला जाऊ शकतो.
रविवारी सकाळी 11 वाजता या योजनेची सुरूवात होणार आहे. रविवारचा दिवस हा ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ऐतिहासिक राहणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. कोट्यवधी भारतीयांसाठी ही योजना महत्त्वाची ठरेल असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलंय.
ग्रामीण भागातल्या नागरिकांन आपल्या संपत्तीचा उपयोग आर्थिक गोष्टींसाठी करता यावा यासाठी एक कार्ड दिलं जाणार आहे
त्याचबरोबर त्याचा इतर योजनांसाठीही फायदा होणार आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 1 लाख नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर संपत्ती कार्डची लिंक दिली जाणार असून ते कार्ड त्यांना डाऊनलोड करता येईल. नंतर प्रत्यक्ष त्यांना ते कार्ड दिलं जाणार आहे.
6 राज्यातल्या 763 गावांना याचा फायदा होणार आहे. यात महाराष्ट्रातल्या 100, उत्तर प्रदेश 346, हरियाणा 221, मध्य प्रदेश 44, उत्तराखंड 50 आणि कर्नाटकातल्या 2 गावांचा समावेश आहे.
महाराष्ट्र वगळून इतर सर्व राज्यांमध्ये एका दिवसात संबंधितांना कार्ड दिलं जाणार आहे. महाराष्ट्रात त्या कार्डसाठी काही शुल्क घेतलं जाणार असल्याने त्याला 1 महिना लागणार असल्याची माहिती दिली जात आहे.