आजच्याच दिवशी पहिल्यांदा आमदारकीची शपथ, शरद पवारांच्या कारकिर्दीला 54 वर्ष पूर्ण!

 

 

आजच्याच दिवशी पहिल्यांदा आमदारकीची शपथ, शरद पवारांच्या कारकिर्दीला 54 वर्ष पूर्ण!

आजच्या दिवशी म्हणजे 22 फेब्रुवारी 1967 रोजी शरद पवारांनी (Sharad Pawar) पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली होती.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या संसदीय राजकारणाला 54 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी म्हणजे 22 फेब्रुवारी 1967 रोजी शरद पवारांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ (sharad pawar first oath ) घेतली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत शरद पवार सलग कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. शरद पवारांनी राज्यासह देशाच्या राजकारणात महत्त्वाची पदं भूषवली.

शरद पवार हे महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्याशिवाय त्यांनी देशाचे सरंक्षणमंत्रीपद सांभाळलं. मनमोहन सिंह सरकारमध्ये ते कृषीमंत्री होते.

शरद पवार यांच्याकडे देशातील सर्वात ज्येष्ठ असलेले राजकारणी म्हणून पाहिले जाते. वयाच्या 80 व्या वर्षात देखील राष्ट्रीय राजकारणात सक्रीय असलेले शरद पवार हे एकमेव राजकारणी आहेत.

27 व्या वर्षी आमदार, 38 व्या वर्षी मुख्यमंत्री

शरद पवार यांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली तेव्हा त्यांचे वय अवघे 27 वर्ष होते. बारामतीसारख्या दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना दिली होती. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात त्यांनी काम केले. देशातील सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचा मानही शरद पवार यांच्याकडेच आहे.

1978 साली, वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले त्यावेळी देशातील सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री हे बिरुद त्यांना लाभले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद त्यांनी एकूण चार वेळा भूषविले.

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने २००४ साली सत्ता स्थापन केली होती. या सरकारमधील कृषी, ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा व सार्वजनिक वितरण मंत्रालयाची जबाबदारी पवारांकडे सोपवण्यात आली. यापूर्वी, देशाचे संरक्षणमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष यांसारखी पदे त्यांनी सांभाळली आहेत.

त्याआधी 1999 मध्ये त्यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीचा घटकपक्ष आहे.

105 आमदारांना विरोधात बसवलं

शरद पवारांच्या 54 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक संघर्षाचे प्रसंग आले. शरद पवारांची राजकीय कारकीर्द संपली असे हल्ले भाजपकडून झाले. मात्र शरद पवार यांची किमया काय आहे हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी देशाला दाखवलं. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरुनही 105 आमदारांना विरोधी पक्षात बसवण्याची किमया शरद पवारांनी केली.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: