कंसिस्टंसी असल्याने त्याचा आपल्याला खूप फायदा होतो.
या कंसिस्टंसीमध्ये प्रचंड ताकद असते.
मेराज बागवान
(बारामती)
‘सातत्य’ हा शब्द आपण अनेकवेळा न्यूज चॅनेल्स , तसेच वर्तमानपत्रात वाचतो. “सातत्याने , भाववाढ होते आहे” ,असे काहिसे. सातत्य…हा तसा सहजच वापरला जाणारा शब्द.मात्र , ह्या साध्याशाच शब्दात खूप मोठी जादू आहे बरं का.जी अशक्य गोष्टी शक्य करून दाखविते.
तर, सातत्य….सातत्य म्हणजे काय?
तर , सातत्य म्हणजे, एखादी गोष्ट कायम करीत राहणे.इंग्रजीत ‘कंसिस्टंसी’ असा याचा अर्थ.पण , ही कानसिस्टंसी योग्य, चांगल्या आणि सकारात्मक कामातच, गोष्टीतच हवी.नाहीतर , एखादा व्यक्ती सातत्याने उशिरा च पोचतो, वेळ पाळत नाही, तर अशा कंसिस्टंसी चा काही उपयोग नाही.
जर का आयुष्यात नेहमीच योग्य सातत्य असेल, तर कामे व्यवस्थित पार पाडतात.प्राधान्यक्रम देउन कामे करणे आणि कामात चालढकल करणे ह्या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मात्र हीच कामे करीत असताना, सातत्य हे हवेच.
ह्या ‘कंसिस्टंसी’ मध्ये एवढी ताकद असते, की अगदी जेमतेम बुद्धीने हुशार असणारा व्यक्ती देखील भले मोठे यश मिळवू शकतो. योग्य दिशेने हे ‘सातत्य’ ठेवले तर खरेच आयुष्याचे सार्थक होते. सातत्याची अशी अनेक उदाहरणे आहेत , ज्यामुळे अनेकांची आयुष्य योग्य मार्गाला लागली आहेत.
काही वेळेस आपल्याला आयुष्यातील काही लढाया ह्या एकट्यानेच लढवाव्या लागतात.काही जण साथ सोडतात, काही जण मुद्दाम त्रास देण्यासाठी मदत करीत नाहीत.मग अशा वेळेस, आपल्याकडे ‘सातत्य’ हा गुणधर्म असेल तर कोणावर अवलंबून न राहता सर्व गोष्टी साधता येतात, पूर्णत्वास नेता येतात आणि ही लढाई आपण नक्कीच जिंकू शकतो.
फक्त हार न मानता चिकाटी सोडली नाही पाहिजे.कोण काय म्हणतंय या कडे लक्ष विचलित न होता, आपण आपल्या ‘कंसिस्टंसी’ बरोबर चालत राहिलो की आपसूकच आत्मविश्वास वाढीस लागतो आणि मग कोणत्याच संकटाची भीती वाटत नाही.
असे हे ‘सातत्य’ , अशी ही ‘कंसिस्टंसी’ स्वविकासात खूप महत्वाची भूमिका बजावते.