तेव्हाच्या पूरपरिस्थितीत आम्ही थेट बोटीत बसून निर्णय घ्यायचो- चंद्रकांत पाटील

 

सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून मुख्यमंत्र्यांनी अद्याप त्या ठिकाणी भेट न दिल्याने विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आमच्या काळात आम्ही बोटीत बसून निर्णय घ्यायचो अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले, २०१९ साली कोल्हापूर, सातारा, सांगली भागात गंभीर पूर परिस्थती बनली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, मी महसूलमंत्री होतो. मी आणि देवेंद्र फडणवीस डायरेक्ट फिल्डमध्ये होतो. त्यावेळी आम्ही ४ लाख ७३ हजार लोकांना पुरातून बाहेर काढले होते. अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो. तरीही काँग्रेसने आमच्यावर टीका केली.

ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात येऊन वॉररूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलले पाहिजे. त्यांच्याकडून आढावा घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजेत. आम्ही सरकारला कधीही मदत करायला तयार आहोत. पण त्यांना कोणाची मदत नको असते. कोणाशीही बोलायला आम्ही तयार आहोत. सढळ हाताने मदत करायला तयार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: