महाराष्ट्रात करोनाचा धोका वाढतोय; आता ‘या’ शहरात सलग तीन दिवस जनता कर्फ्यू
जळगाव : जळगाव जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यासह शहरात करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता करोनाची साखळी तोडण्यासठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार असा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या तीन दिवसांत शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठा बंद राहणार आहेत. सर्वांनी जनता कर्फ्यूचे पालन काटेकोरपणे करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह प्रशासनाने केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडील पत्र 14 मार्च, 2020 अन्वये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा 13 मार्चपासून लागू करुन खंड, 2,3, व 4 मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली आहे. जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेली आहे. ज्या विशिष्ट प्रवर्गातील जनता कर्फ्यूमधून सूट देण्यात आलेली आहे.
त्यांनी आपल्या सोबत आपले कार्यालयाचे, आस्थापना, शाळा, महाविद्यालयाचे ओळखपत्र तसेच 14 मार्च 2021 रोजी होणार्या एम.पी.एस.सी. परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे हॉल तिकीट सोबत बाळगणे अनिवार्य राहील, असेही जिल्हाधिकार्यांनी आदेशात नमूद केले आहे.
महाराष्ट्र राज्यात व देशांतर्गत कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित झालेल्या व्यक्तीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निर्देश दिलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात कोविड, 19 विषाणुमुळे रुग्ण संख्येत वाढत होत आहे. त्यामुळे त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
याकरीता जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव हद्दीत कडकडीत लॉकडाऊनबाबत निर्बंध लागू न करता कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, समाजसेवी संघटना यांनी ‘जनता कर्फ्यू’ द्वारे काही निर्बंध लागू करण्याबाबत मागणी केली आहे. त्यानुसार नियमावली जाहीर करुन नागरिकांना सुचित करणे आवश्यक आहे. जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत 11 मार्च 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 15 मार्च रोजी 2021 रोजी सकाळी 8 वाजेपावेतो ‘जनता कर्फ्यू’ घोषित करण्याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येत आहे. नागरिकांना या दिवशी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
‘जनता कर्फ्यू’ दरम्यान जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत यासोबतच्या ‘परिशिष्ट 3’ मध्ये नमूद केल्यानुसार आस्थापना, बाबी, ह्या सुरु बंदी राहतील. तसेच ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर विभागाच्या परीक्षा आयोजित करण्यात येत असल्याने कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेकरीता नेमलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान लागू केलेल्या निर्बंधातून सूट राहील.