हवामान खात्याकडून या जिल्ह्याला देण्यात आला खबरदारीचा इशारा
मुंबई , नवी मुंबईसह राज्यातील अनेक शहरांमध्ये रविवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही राज्याभर पाऊस कोसळणार असून अनेक ठिकाणी थंडीचा पारा वाढण्याची शक्यता आहे.
सोमवार सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई , पालघर, वसई-विरार, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढचे ३ ते ४ तास असाच पाऊस राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
तर राज्यात उत्तर कोकणातही ढगाळ वातावरण आहे. पुढच्या ३-४ तासांमध्ये इथं हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिली आहे. यासंबंधी त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. इतकंच नाही तर पुढच्या २४ तासांत मुंबई, पुण्यासह नागपूर परिसरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.