देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कोरोना मृत्यू संदर्भात केले ‘हे’ गंभीर आरोप

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून त्यांनी मुंबईत कोरोनामुळे होणारी मृत्यू संख्या सातत्याने दडवण्याचे काम होत असल्याचा आरोप केला आहेत. मुंबईत सातत्याने कोरोना चाचण्या कमी होत असून त्यातही RT-PCR चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका असून राज्यातील एकूण मृत्यूपैकी 20 टक्के मृत्यू मुंबईत झाले असताना जुन्या नोंदी अद्यावत झाल्या नाहीत असाही आरोप पत्रातून केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

मुंबईत रिकन्सिलिएशनचे काम अजून पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे जुनी मृत्यूसंख्या नंतर टप्प्याटप्प्याने अधिक करुन नेमके चित्र उभे राहणार नाही. मुंबईच्या घाटांवर रोज अंत्यसंस्कार होणारे मृतदेह आणि रोजची दिली जात अलेली मृत्यू संख्या यांचा कुठेही ताळमेळ दिसत नाही.

 

हीच परिस्थिती राज्यामधील इतर जिल्ह्यामध्ये देखील आहे. राज्यातील एकूण कोरोनाबळींच्या संख्येत एकट्या मुंबईत 20 टक्के मृत्यू आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या कोणत्याच भागाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. त्यामुळे मुंबईत चाचण्या मोठ्या प्रमाणावर वाढवाव्यात. तसेच राज्याच्या अन्य भागात देखील ‘टेस्ट, स्ट्रेस अँड ट्रीट’ हे तत्व काटेकोरपणे पाळण्याची आवश्यकता आहे. यातही केंद्राच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे RT-PCR चाचण्यांचा पुरेसा समतोल राखण्यात यावा, हे पुन्हा एकदा मी आपल्या निदर्शनास आणून देत आहे.

महाराष्ट्र केंद्राचे निकष पाळत नाही- फडणवीस

राज्यात जवळजवळ ४० टक्के चाचण्या अँटिजेन पद्धतीने होत आहेत. त्यामुळे २६ एप्रिल रोजी नोंदवलेल्या मुंबईतील २८ हजार चाचण्यांमधील ४० टक्के अँटीजेन चाचण्या गृहित धरल्या तर केवळ १६,८०० आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत. रविवारी २५ एप्रिल रोजी राज्यात एकूण २,८८,२८१ चाचण्या नोंदविण्यात आल्या. त्यातील १,७०,२४५ आरटी-पीसीआर चाचण्या होत्या (५९ टक्के), तर १,१८,०३६ चाचण्या या रॅपिड अँटीजेन म्हणजे एकूण ४१ टक्के. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण ७० टक्क्यांच्या वर हवे, असे केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने सांगितले जात असताना सुद्धा त्याचे पालन होताना दिसत नाही, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस पुढे लिहितात,मुंबईच्या बाबतीत अतिशय सजगतेने काम करण्याची आवश्यकता आहे. याचे कारण मुंबईतून संक्रमित लोक गावी गेले आहेत. गेल्या लाटेत त्यांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग जसे झाले होते, तसे आता होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याचे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: