मराठा आरक्षणासाठी लढणारा नेता हरपला, विनायक मेटेंचा प्रवास थक्क करणारा प्रवास
मुंबई, 14 ऑगस्ट : मराठा समाजासाठी रात्रंदिवस झटणारे समाजातील तळागाळातील व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी काय रस्त्यावरची लढाई करणारे नेते शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. (Vinayak Mete Biography) राजकारण कळायला सुरूवात झाल्यापासून ते वयाच्या 52 वर्षांपर्यंत संघर्ष करणाऱ्या विनायक मेटे यांचा मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा प्रवास मोठा होता. आज पहाटे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आणि मराठा समाजाचा बुलंद आवाज थांबला.
30 जून 1970 रोजी सामान्य कुटूंबात जन्मलेल्या विनायक मेटे यांनी पाच वेळा विधान परिषद सदस्यत्व मिळविण्याचे रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. बीड जिल्ह्यातील राजेगाव (ता. केज) या खेडेगावचे ते रहिवाशी होते. त्यांनी व्यवसायानिमित्त मुंबई गाठली यावेळी मराठा महासंघाशी त्यांचा संबंध आला. आणि यातूनच त्यांनी सामाजिक कामाला सुरुवात केली. पहिल्या युती सरकारच्या काळात म्हणजे 1995 साली त्यांना विधान परिषदेवर पहिल्यांदा संधी मिळाली. दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी या पक्षाची स्थापना केली.
पुढच्या काही काळात विनायक मेटे यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संबंध आले. त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे त्यांना उपाध्यक्ष पदासह दोन वेळा विधान परिषदेवरही संधी देण्यात आली. मागच्या लोकसभेच्या वेळी त्यांनी भाजपसोबत आघाडी केली. पक्षांतरामुळे त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा संधी दिल्याने त्यांनी विधान परिषदेची तिसरी टर्मही पुर्ण केली. आता चौथ्या वेळेस ते विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम करत आहेत.
विनायक मेटे यांनी शिवसंग्राम पक्षाची स्थापना केली यानंतर त्यांनी राज्यासह बीड जिल्ह्यात मोठा जनसंपर्क केला होता. मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही घटना असेल तर त्यांच्याशी जोडली जायची. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य म्हणून ते काम पाहिले आहे.
मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढविणे अशा विषयांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मराठवाडा लोकविकास मंचतर्फे राज्यात नाव कमावलेल्या मराठवाड्यातील नामांकीत व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. यामध्ये दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे, दिवंगत गोविंदभाई श्रॉफ आदींचा गौरव करण्यात आला आहे.