उजनीत येणारी आवक 17 हजार 600 क्युसेक, 14.36 टक्के झाला उपयुक्त पाणीसाठा
पंढरपूर– भीमा खोर्यात होत असलेल्या पावसामुळे दौंडजवळून उजनी धरणात मिसळणारी आवक 17 हजार 600 क्युसेक इतकी झाली आहे. धरण उपयुक्त पातळीत 14.36 टक्के भरले असले तरी जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत 72 टक्क्यांनी कमी आहे. 2019 ला याच तारखेला उजनी धरण 86.84 टक्के भरले होते.
भीमा खोर्यात कालपासून पावसाची दमदार हजेरी लागली असून याचा फायदा तेथील प्रकल्प भरण्यास होत आहे. याच बरोबर भीमानदी परिसरात होत असलेल्या पर्जन्यमानामुळे उजनीत येणार्या पाण्यात वाढ आहे. बुधवारी सायंकाळी साडेचार हजार क्युसेकची असणारी आवक गुरूवारी सकाळी 17 हजार 600 वर पोहोचली आहे.
यामुळे धरण वधारण्यास नक्कीच फायदा होईल. आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी 492.080 मीटर होती तर एकूण पाणीसाठा हा 2020.67 दशलक्ष घनमीटर (71.35 टीएमसी) होता.
उपयुक्त पाणी 217.86 दलमघी (7.35 टीएमसी) असून याची टक्केवारी 14.36 टक्के होती. मागील चोवीस तासात उजनी परिसरात केवळ 1 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या पावसाळा हंगामात एकूण 443 मि.मी. पर्जन्याची येथे नोंद आहे.
मागील वर्षी 2019 ला 6 ऑगस्ट रोजी उजनी धरणात दौंडजवळून मिसणारी आवक ही 2 लाख 21 हजार क्युसेक इतकी प्रचंड होती तर धरण 86.84 टक्के उपयुक्त पातळीत भरले होते.
मागील वर्षी 28 जुलै रोजी उजनी प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर आला होता व अवघ्या आठ- दहा दिवसात तो झपाट्याने भरला होता. मागील वर्षीची व यंदाची तुलना केली तर सध्या उजनी प्रकल्पात 72 टक्के उपयुक्त पाणीसाठा कमी आहे. भीमा खोर्यात उशिरा पावसाचे आगमन झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.