20 जानेवारीपर्यंत राज्यात महाविद्यालये सुरु करण्याचा विचार – उदय सामंत

20 जानेवारीपर्यंत राज्यात महाविद्यालये सुरु करण्याचा विचार – उदय सामंत

ग्लोबल न्यूज – राज्यात येत्या 20 जानेवारीपर्यंत राज्यातील विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून घेण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालये सुरु करण्याचा विचार आहे.

प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रिया मधील अडथळे या आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी उदय सामंत यांनी शनिवारी (दि. 9) फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला.

50 टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरु करण्यासाठी विद्यापीठातील वसतिगृहे, स्थानिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. प्राचार्य भरतीला दिलेल्या मान्यतेप्रमाणेच विद्यापीठातील इतर संवैधानिक रिक्त पदे आणि सहाय्यक प्राध्यापक पदे भरण्याचा निर्णय लवकर घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या सर्व अभ्यासक्रमांना 15 जानेवारीपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. विधी प्रवेशांना ही सोमवार, मंगळवार या दिवशी आणखी 2 दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जिल्हास्तरीय, परराज्यात व सीमा भागात केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या दृष्टीने चर्चा व प्रयत्न सुरू आहेत. गोंडवाना विद्यापीठात अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्याला परवानगी देण्यात आली आहे. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मॉडेल कॉलेज उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: