विचारांच्या उंचीला कृतीचं बळ मिळण्याकरिता लागते ती दुर्दम्य इच्छाशक्ती !
जगातील मोठ्यातल्या मोठ्या आणि अशक्यप्राय गोष्टी घडल्या आहेत त्या केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर. अशीच दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणाऱ्या एका अवलियासोबत ओळख झाली. संदीप परब. पदवी प्राप्त केल्यानंतर मास्टर ऑफ सोशल वर्कच्या अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी २०१३ साली ‘जीवन आनंद’ संस्थेची स्थापना केली. रस्त्यावरील अंध, अपंग, मनोरुग्ण, निराधार वृद्ध – बालके यांचे पुनर्वसन करण्याचे काम ‘जीवन आनंद’ ही संस्था करते.
मुंबईतील वाकोल्याच्या ब्रिजखाली सुरु झालेला हा कर्मयज्ञ आज महाराष्ट्रभर पसरण्यास सज्ज झालाय. खार, सांताक्रूझ, विरार आणि सिंधुदुर्गातील कुडाळ असे चार आश्रम ‘जीवन आनंद’ संस्थेद्वारे चालविण्यात येतात. जवळपास १२० आश्रितांचे सद्य स्तिथीत पुनर्वसन झाले आहे. यांच्या खार सेंटरच्या एका विद्यार्थ्याने आपले शिक्षण पूर्ण करून एका नामांकित सी ए कंपनीत कामही सुरु केले आहे. यांच्या कुडाळच्या आश्रमात भाजीपाला, फळांचे उतपडणंही घेतले जाते तसेच गांडूळ खताचा प्रकल्पही राबवला जातो. वृद्धांना वनभोजनास नेले जाते. सरत्या वयात त्यांना जीवनाचा आनंद देणारी ही संस्था ! कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत आश्रमवासीयांकरिता वेळोवेळी वैद्यकीय चाचण्या, वृद्धांच्या मानसिक आरोग्याकरिता योग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहेत.
अर्थात हा कर्मयज्ञ सुरु आहे तो स्वयंसेवक आणि देणगीदारांची भक्कम आधारावर. कुडाळ येथील आश्रमातील एक आजी अचानक आजारी झाली. लोकडाऊन असल्याने कुडाळमध्ये कोणतेही हॉस्पिटल त्यांना भरती करून घेत नव्हते. अखेर त्यांना सावंतवाडीला ऍडमिट करावं लागलं. कोरोनाच संकट, लोकडोवन आणि त्यात भर म्हणजे मनातील भीती. असं असतानाही आश्रमाच्या स्वयंसेविका स्नेहा कासकर यांनी शिवधनुष्य उचलले आणि आजींना अगदी डिस्चार्ज होईपर्यंत नाष्टापासून जेवणाची सर्व सोय करून दिली. ( स्नेहाताई माझी आत्येबहीण हे खरं तर माझं भाग्य) इतकंच नव्हे तर आश्रमाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठीही स्नेहाताई अग्रेसर असतात. विचारांची बैठक जमली की कृती करण्याची उमेद आपोआप निर्माण होते ती अशी.
” हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे,
माणसाने माणसाशी माणसासम वागणे “
गीतकार समीर सामंतांनी आपल्या या गीतात जे मागणे मागितले आहे ते खऱ्या स्वरूपात पूर्ण करत आहेत जीवन आनंद सारख्या संस्था !
मानाचं मोठेपण आणि सेवाभावी वृत्तीचं गोंदण लागलं तर नक्कीच आयुष्य सजून निघतं….!!!
- अमोल मटकर