राज्यात लॉकडाऊन काळात आलेल्या अव्वाच्या-सव्वा बिलामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. त्यात महावितरण कंपनीने कडक धोरण स्वीकारत बिल न भरणाऱ्यांची वीज खंडित करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाद होताना दिसत आहे.
त्यातच आता वीज तोडणीसाठी आलेल्या अभियंत्याला चक्क भाजपा आमदाराने खुर्चीला बांधून ठेवले आहे. चाळीसगावचे आमदार भाजपा आमदार मंगेश चव्हाण आपल्या समर्थकांसह अभियंत्याच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी वीज तोडणीचा जाब विचारला. दरम्यान यावेळी धक्काबुक्की करण्यासह अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावर बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जात आहे त्याविरोधात आम्ही येथे आलो आहोत. पाणी दोन दिवसांत जोडलं गेलं नाही तर हातातोंडाशी आलेलं पीक जाऊ शकतं. त्यासाठी शेतकऱ्यांसोबत आलो असता शेख यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना जागेवरच बांधून ठेवलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.