राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते सतत टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. सध्या दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये लोडशेडिंगचे संकट उभे राहिले आहे. त्यावरून भाजप नेते तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारला सल्ला दिला आहे.
राज्यावर वीज निर्मितीचे संकट असले तरी लोडशेडिंगची वेळ येऊ देणार नाही’, असा विश्वास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केला. त्यावरून बावनकुळेंनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, राज्यावर लवकरच लोडशेडिंगची परिस्थिती निर्माण होणार आहे.
आजही राज्यातील शेतकरी रात्री अंधारात राहतोय. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री यांनी शेतकऱयांवर अंधारात राहण्याची वेळ येऊ देऊ नये. मुख्यमंत्र्यानी लवकरात लवकर ३२ लाख टन कोळसा राज्यात वितरित केला पाहिजे. आणि राज्यात लोडशेडिंग होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.