कोरोनामुळे यंदा राज्यातल्या सर्वच शाळांधील दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बोर्डाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत सर्वच विद्यार्थ्यांचं न्यायिक मूल्यमापन कसं होणार हा प्रश्न आहे? त्यावर तोडगा म्हणून शाळा स्तरावर परीक्षा घेण्याची मागणी जोर धरू लागलीय.
कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीचे वर्ग अगदी परीक्षेच्या तोंडावर सुरू झाले. त्यात अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकलेला नाही. आता परीक्षा अगदी जवळ आलीय. त्यामुळे बोर्डाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत सर्वच विद्यार्थ्यांचं न्यायिक मूल्यमापन कसं होणार? याची चिंता सर्वांनाच लागलीय. त्यामुळे आता जितका अभ्यासक्रम पूर्ण झालाय. त्यावर आधारित शाळा स्तरावर परीक्षा घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेनं केलीय.
कोरोनामुळे यंदा ऑनलाईन शाळा भरल्या असल्या तरी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. मोबाईलपासून ते इंटरनेटपर्यंत अनेक समस्यांमुळे या विद्यार्थ्यांची तयारीच होऊ शकलेली नाही. अशा परिस्थितीत बोर्डाच्या परीक्षेला सामोरं कसं जायचं हा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर उभा राहिलाय. तर शाळास्तरावरील परीक्षेबाबतची सूचना शिक्षणमंत्र्यांसमोर ठेवू असं आश्वासन बच्चू कडूंनी दिलंय.
दहावी-बारावीची शाळा स्तरावर घेतल्यास अभ्यासक्रामात जे घटक शिकवण्यात आले त्यावरच परीक्षा घेणं सोयीस्कर होईल शिवाय विद्यार्थ्यांचं मूल्यमापनही योग्यरित्या होईल असा दावा शिक्षक आणि पालकांकडून केला जातोय. त्यामुळे सरकार यावर काय निर्णय घेतं याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.