शिक्षक ते शिक्षण उपसंचालक ; औदुंबर उकिरडे यांचा प्रेरणादायी प्रवास
बार्शी: बार्शी तालुक्यातील आगळगाव हे संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे .बहुतेक सर्व घरात एक -दोन व काही काही घरात अठरा शिक्षक असलेले गाव. राज्यातील जवळजवळ सर्व जिल्ह्यात आगळगावातील शिक्षक नोकरीनिमित्त आहेत, एवढेच नाही तर गुजरात मधील अहमदाबाद महानगरपालिकेत देखील आगळगावचे शिक्षक नोकरीसाठी होते. परंतु बरेच वर्षे शिक्षण क्षेत्रातील अधिकारी मात्र या गावात नव्हते,आणि हीच उणीव भरून काढली ती आगळगांवचे सेवानिवृत्त शिक्षक श्री संपतराव कुंडलिक उकिरडे व सौ इंदुमती संपतराव उकिरडे यांचे चिरंजीव श्री औदुंबर संपतराव उकिरडे म्हणजेच आजचे पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक.
औदुंबर उकिरडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगळगाव, माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय काटेगाव, आणि उच्च माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे झाले. त्यांचा भाऊ संतोष व वहिनी स्वाती, बहीण साधना व दाजी मनोज आणि पत्नी सौ सुवर्णा हे सर्व शिक्षक आहेत.
औदुंबर यांनी पहिली पासून ते पदव्युत्तर पदवी पर्यंत पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. चौथी व सातवी शिष्यवृत्ती धारक होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे, 10 वीला 89 टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला, नंतर 12 वी ला शास्त्र शाखेत 78 टक्के व ग्रुपिंग ला 89 टक्के गुण मिळवले. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची त्यांची इच्छा थोडयाशा गुणांनी हुकली, नंतर बी.ए.एम.एस, बीएस्सी, बीएस्सी ऍग्री की डीएड् या संघर्षात दोन वर्षांचा डी एड् अभ्यासक्रम शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय येथे पूर्ण केला .
नंतर श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात बी ए पदवी इंग्रजी विषयात पूर्ण केली. बी ए ला शिवाजी विद्यापीठात द्वितीय क्रमांकासह सुवर्णपदक मिळवले, त्यानंतर शिवाजी महाविद्यालय बार्शी येथून इंग्रजी विषयात बी प्लस ने पदव्युत्तर पदवी मिळवली.
या सर्व शिक्षण प्रवासात अभ्यास मात्र मनापासून केला तोही निसर्गाच्या सानिध्यात, कधी आगळगावतील शेतात, कधी मोसंबीच्या बागेत,तर कधी गावाच्या परिसरातील झाडाखाली केला. मोजकाच परंतु अगदी घट्ट मैत्री जपणारा मित्रपरिवार असणाऱ्या या अवलीयाचे वैशिष्ट्य म्हणजे जे काम हातात घ्यायचे त्याचा सुरुवातीला च पूर्ण अभ्यास व नियोजन करून ताकदीने पाठपुरावा करायचा, त्यासाठी कठोर परिश्रम करायचे यामुळेच त्यांनी सर्व शैक्षणिक वाटचालीत उज्जवल यश मिळवले.
दरम्यानच्या काळात रायगड जिल्हा परिषदेत वडगाव गावी प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी लागली. अध्यापन करीत असताना अध्ययन मात्र सोडले नाही. विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवत असताना स्वतःही सर्व विषयाचा अभ्यास केला. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेत असताना स्वतः चाही अभ्यास झाला. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे याची जाणीव त्यांना झाली, आणि या क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी याच क्षेत्रातील आपण अधिकारी झाले पाहिजे अशी जाणीव त्यांना झाली आणि त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केले.
2004 मध्ये प्राचार्य नेताजी सोलवट यांच्या कन्या सुवर्णा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. नंतर बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद उपळाई ठोंगे या शाळेत बदली झाली. तीन वर्षे या शाळेत नोकरी करीत असताना अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनवले, वृक्षारोपण सह अनेक उपक्रम राबविले व शाळेची गुणवत्ता वाढवली.
याच दरम्यान दोन वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मंत्रालय सहायक, विक्रीकर निरीक्षक, उपशिक्षणाधिकारी या पदावर निवड झाली. हा सर्व अभ्यास करत असताना एक दिवसही रजा न घेता सकाळी व संध्याकाळी नियोजनपूर्वक अभ्यास करून यश मिळवले.त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पत्नी सौ सुवर्णा यांची खरी साथ त्यांना मिळत आहे. मुलगा उत्कर्ष, मुलगी श्रेया यांचा अभ्यास , कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणे ही सर्व कामे त्या स्वतःची नोकरी सांभाळून अगदी मनापासून करतात , म्हणूनच औदुंबर यांना ही शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येते हे निर्विवाद सत्य आहे.
2011 साली उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतरही अभ्यास चालूच ठेवला व 2012 साली एमपीएसी परीक्षामार्फत शिक्षणाधिकारी (वर्ग 1) म्हणून निवड झाली. याही परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला.या सर्व परीक्षेत कोठेही क्लास न लावता घरीच अभ्यास करून उज्ज्वल यश मिळवले.
भूम येथे गटशिक्षणाधिकारी, उस्मानाबाद येथे शिक्षणाधिकारी, लातूर येथे शिक्षणाधिकारी व ला लातूर बोर्डाचे विभागीय सचिव म्हणून कार्य करीत असताना नेहमीच आपल्या कार्याचा चांगला ठसा उमटवून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक, गुणवत्तापूर्ण काम केले आहे.एखादी जबाबदारी घेताना त्याचा परिपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन, जास्त न बोलता प्रत्यक्ष खूप काम, स्वीकारलेल्या जबाबदारीला योग्य न्याय देणं या त्यांच्या गुणामुळे त्यांनी स्वीकारलेल्या कामात त्यांना नेहमीच यश मिळत गेले आहे, याचाच एक भाग म्हणून राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांचा गौरवपूर्ण नामोल्लेख झाला आहे.ही निश्चितच अभिमानास्पद गोष्ट आहे.
मार्च 2019 च्या एस एस सी परीक्षेत लातूर विभागात 14 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले होते, त्यानंतर 19 – 20 या शैक्षणिक वर्षात उकिरडे साहेबांनी सर्व विषय शिक्षकाचे गट करून शिक्षक व मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक गुणवत्तेविषयी कार्यशाळा आयोजित केल्या आणि त्याचा परिणाम म्हणून मार्च 2020 च्या एस एस सी परीक्षेत 134 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवून राज्यात विक्रम करून लातूर पॅटर्नला पुन्हा एकदा उभारी दिली.
असेच कार्य करीत असताना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार त्यांना पुणे विभागाचे उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्याकडून इथुन पुढील काळातही शिक्षण क्षेत्रात भरीव काम होवो यासाठी मनापासून शुभेच्छा.
निसर्गाच्या कुशीत
आगळगवच्या मातीत
एक बीज अंकुरले,,
उंच भरारी घेण्याचे
स्वप्न त्याने साकारले,
ध्येयाचा रस्ता खडतर
प्रयत्नाने बनला सुखकर,
सुवर्णसंधी आली दारी
मग घेतली उत्तुंग भरारी,,
🏆यश लोळते पायाशी,
तरी नाते आहे मातीशी…..
@🖊️सचिन उकिरडे