“संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिलाय आणि…”; राज ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचे कौतुक
मुंबई – पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि भाजपा यांच्यात थेट लढत पाहायला मिळत होती. बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पंतप्रधानांपासून कार्यकर्त्यांपर्यंत जोर लावला होता. परंतु प. बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या हाती सत्ता देण्याचं ठरवलं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू आहे. या निवडणुकीच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या निवडणूक निकालाबाबत राज ठाकरेंनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करताना म्हटलंय की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जींचे अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलं. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ह्याच्यात खूप समानता आहे असं ते म्हणाले.
त्याचसोबत राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता यांचे महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठी आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा व्यक्त करतो. तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचं आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलं आहे.