राज्य सरकारचं अधिवेशन केवळ ५ दिवसांचं, मात्र विरोधकांनी दर्शवली नाराजी

 

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश यावेळी मुंबईतच होणार आहे.याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दरम्यान, हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न होणे हे निंदनीय आहे. नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपूरला व्हायला पाहिजे, असा नियम आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत नाराजी दर्शवत मार्च महिन्यातील अधिवेशन नागपुरात घेण्यात यावं, अशी मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनासंदर्भात माहिती देत सरकारच्या अधिवेशन धोरणावर टीका केली आहे. राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळत आहेत, अधिवेशन केवळ ४ ते ५ दिवसांचं घेण्यात येणार आहे. पहिला दिवस केवळ शोक प्रस्तावात जातो, त्यामुळे यंदाचं अधिवेशनही केवळ ४ दिवसांचं आहे. आमची मागणी होती, अधिवेशन वाढविण्यात यावा. मात्र, सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यास नकार दिल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

तसेच, तारांकीत प्रश्नांवर गेल्या २ वर्षात एकदाही उत्तर देण्यात आलं नाही, लक्षवेधीलाही उत्तर मिळत नाही. त्यामुळे, सरकारने सगळी आयुधं गोठविण्याचं काम केलंय. दरम्यान, माझ्या मागणीनंतर अधिवेशनापूर्वी तारांकीत प्रश्नांची उत्तरं देण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या टीकेला महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: