नवी दिल्ली : काँग्रेस पक्षातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत.
सोमवारी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे आणि त्यापूर्वी ही मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपद सांभाळत आहेत. आज होणाऱ्या सीडब्ल्यूसीच्या बैठकीत सोनिया गांधी आपला अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी एक पत्र लिहिलं असून ते पत्र समोर आलं आहे. त्या पत्रात काँग्रेस पक्षाचं नेत्रृत्व तरुण आणि प्रभावी व्यक्तीने करावं असं बोललं जात आहे. तसेच काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा अशीही मागणी होत आहे.
काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रात, भाजपच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष देण्याची मागणी केली आहे. देशातील आर्थिक संकट, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि चीनसोबत सुरू असलेल्या सीमा वादामुळे निर्माण झालेली परिस्थिती या सर्व संकटाचा भारताला सामना करावा लागत आहे. काँग्रेस नेत्यांनी मागणी केली की, कार्यकारिणीपासून पक्षातील इतर सर्व पदांसाठी निवडणुका झाल्या पाहिजे. या पत्रावर काँग्रेस पक्षांतील ज्या नेत्यांची नावे आहेत त्यामध्ये गुलाम नवी आझाद, आनंद शर्मा, भूपिंदर सिंह हड्डा, वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह एकूण २३ नेत्यांची स्वाक्षरी आहे.
https://twitter.com/kcvenugopalmp/status/1297156884118433792?s=19
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षात गांधी घराण्याच्या नेत्रृत्वाला आव्हान देणाऱ्या पक्षातील काही नेत्यांचा विरोध करताना म्हटलं की, अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित करण्याची ही वेळ नाहीये. अमरिंदर सिंग यांनी पुढे म्हटलं की, या महत्वाच्या क्षणी पक्षात बदल करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेसच्या या नेत्यांची मागणी पक्षाच्या हितासाठी आणि देशाच्या हितासाठी हानिकारक ठरेल. काँग्रेस पक्षाला अशा नेत्रृत्वाची गरज आहे जे केवळ काही लोकांनाच नाही तर संपूर्ण पक्षाला, कार्यकर्त्यांना आणि देशाला मान्य असेल. गांधी परिवार या भूमिकेसाठी अगदी योग्य आहेत.