बिहार निवडणुकीत एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत असून आता मुख्यमंत्रीपदावरुन भाजप आणि जेडीयु मध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतमोजणीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याने भाजपा नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी देणार की त्यावर दावा करणार यावरुन अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. अंतिम चित्र निकाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील असं सांगितलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री झाल्यास नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत असं म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“बिहारमध्ये भाजपाचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असं एका सूरात सांगत आहेत. यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत. कारण जो खेळ महाराष्ट्रात खेळण्याचा प्रयत्न झाला. त्यावर आम्ही जो पलटवार केला त्यानंतर भाजपा आपल्या मित्रांशी तसं करणार नाही. शब्द फिरवल्यानंतर काय होऊ शकतं हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील आणि भाजपाला त्यांना करावंच लागेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
फडणवीसांचं अभिनंदन
फडणवीसांचं अभिनंदन करताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “नक्कीच…जे जिंकले त्यांचं अभिनंदन करण्याची आमची परंपरा आहे. फडणवीस बिहारचे प्रमुख होते. त्यांना महाराष्ट्राचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी येथून बिहारमधील सूत्रं नक्कीच हलवली असतील. संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथे कामाला लागली होती. मोदींनी १७ ते १८ सभा घेतल्या. तरीही ३० वर्षांचे तेजस्वी यांनी सर्वांना कामाला लावलं. तोंडाला फेस आणला हे मान्य करावं लागेल”.
तेजस्वी कुमार यांचं कौतुक
“कधी कधी लोक सामना हारतात. पण हारणाऱ्या संघाच्या खेळाडूला संघर्ष करत संघाला पुढे नेल्याबद्दल ‘मॅन ऑफ द मॅच’ दिलं जातं. बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्यासारखा एक चेहरा राष्ट्रीय राजकारणातील नवा चेहरा म्हणून पुढे आला आहे. ३० वर्षाचा एक तरुण ज्याच्या जवळ कोणी मदतीला नाही, मित्रपक्षांचं समर्थन नाही, कुटंबाचा पाठिंबा नाही, केंद्रात विरोधी पक्ष आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रधानमंत्र्यांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत एकटा लढत असेल आणि निवडणूक आपल्याभोवती आणत असेल तर बिहारला एका नवा राजकीय चेहरा मिळाला आहे. यावर आगामी दिवसात विश्वस ठेवून भविष्य पाहू शकतो,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी कौतुक केलं आहे.
शिवसेनेने कायमच जनता दल युनायटेडला अलर्ट करण्याचं काम केलंय. ज्या प्रकारे महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं महाराष्ट्रात फिस्कटलं त्या प्राश्वभूमीवर आताचे कल तसेच बोलतायत असं वाटतं का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर संजय राऊत म्हणालेत की, बिहारमध्ये भाजपचे सर्व नेते एकमुखाने बोलतायत की ‘नितीश बाबू’च मुख्यमंत्री होणार. त्यासाठी नितीश कुमार यांनी शिवसेनेला धन्यवाद द्यायला हवे. कारण महाराष्ट्रात जो खेळ करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आम्ही त्याबाबतीत जो पलटवार केला त्यानंतर आता भारतीय जनता पक्ष आपल्या मित्रपक्षांशी अशा पद्धतीने वर्तणूक करणार नाही. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री बनतील आणि त्यांना मुख्यमंत्री बनवावं लागेलच असंही राऊत म्हणालेत.
दरम्यान माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणालेत की, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा बिहार निवडणुकांमध्ये फायदा झाल्याचे दिसत नाही.
दरम्यान, सध्याच्या राजकारणात कोणतीही नैतिकता बाकी नाही. जर राजकारणात नैतिकता बाकी राहिली असती तर महाराष्ट्रात देखील अनेक गोष्टी एक वर्षाआधीच बदलल्या असत्या असेही संजय राऊत म्हणालेत.