…तर चीन, पाक भारताच्या अस्तित्वाला आव्हान देईल, पुन्हा सामनातून राऊत यांचा मोदी सरकारला टोला

 

मुंबई | पाकिस्तान कश्मीरमध्ये जे उपद्व्याप करीत आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे व अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ज्या प्रकारची ‘अलोकशाही’ राजवट आणली आहे, त्यामागेही खरे बळ चीनचेच आहे. हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील. देशातील राजकीय ईस्ट इंडिया कंपनीने हे समजून घेतले पाहिजे, असं म्हणत शिवसेनेने जोरदार टीका केली.

भारताच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी व धडका मारणे सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे. सीमेवर तणाव आणि रक्तपात वाढला आहे. कश्मीर खोऱ्यांत निरपराध लोकांना घरात, शाळेत, भररस्त्यात गोळ्या घालून मारले जात आहे. त्यात खोऱ्यांतील पूंछमध्ये अतिरेक्यांशी लढताना पाच जवान शहीद झाल्याचे वृत्त चिंता वाढविणारे आहे. दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया सुरूच आहेत हे मान्य, पण त्यात आपल्या सैन्याची मनुष्यहानी मोठय़ा प्रमाणावर होत आहे.

बांदिपोरा, अनंतनाग भागात एखाद्दुसऱ्या दहशतवाद्यास कंठस्नान घातले हे ठीक, पण त्या बदल्यात आमच्या पाच जवानांचे बळी गेले. या दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे. इतके बळी जात असताना आपण पाकिस्तानचे काय वाकडे केले? हा प्रश्नच आहे. उलट अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून पाकिस्तान जास्तच शिरजोर झाला आहे व त्यामुळेच कश्मीर खोऱ्यांतील हिंसाचार वाढला आहे. मोदींचे सरकार असताना कश्मीरातून हिंदूंचे पलायन नव्याने सुरू व्हावे ही गोष्ट काही भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही असं अग्रलेखात म्हंटले आहे.

Team Global News Marathi: