मुंबई | मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासही मतदार संघ सोडणारे माजी आमदार सुनील शिंदे यांनी सेनेच्या प्रत्येक नेत्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनी सोडलेल्या विधानसभा मतदार संघाच्या पार्श्वभूमीवर त्यांना सेनेने विधानपरिषदेवेर पाठवण्याचे निश्चित केले होते तसेच त्यांचे नावही जाहीर करण्यात आले होते, त्यातच आता त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.
शिवसेनेचे वरळी विधानसभेतील माजी आमदार सुनील शिंदे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडल्या जाणाऱया विधान परिषदेच्या मुंबईतील जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्यापाठोपाठ भाजपकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. काँग्रेसकडून भाई जगताप हे उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी अपेक्षा असतानाच मुंबई महापालिकेतील बहुमताचे गणित न जुळल्याने काँग्रेसकडून कोणीच अर्ज भरला नाही.
मात्र काँग्रेसचे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी अपक्ष अर्ज भरल्याने मुंबईतील विधान परिषद निवडणुकीतही चुरस निर्माण होणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण त्यांनी आज दुपारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे आणि भाजपचे उमेदवार राजहंस सिंह यांची निवड आता बिनविरोध होणार आहे.