महाराष्ट्राच्या लाऊडस्पीकर वादाचा आवाज आता देशाच्या विविध भागात पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर 1 मे रोजी सभा घेण्याची घोषणा केली होती. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी करत ३ मे पर्यंतचा अल्टीमेट राज्य सरकारला दिला आहे.
सध्या राज्यातले राजकारण धार्मिक मुद्द्यावरुन राजाकारण चांगलेच तापले आहे. या सर्व मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी इस्लाम जिमखाना परिसरात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यादरम्यान शरद पवार म्हणाले,’देशातील अनेक ठिकाणी सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न होतोय. राजधानी दिल्लीतही तसा प्रयत्न झाला. पण महाराष्ट्रामध्ये जर कोणी सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार असेल तर यावर सर्वानी एकत्र आले पाहिजे हे प्रयत्न अयशस्वी होतील हे पाहिलं पाहिजे,” असं शरद पवार भाषणादरम्यान म्हणाले.