मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागच्या दोन आठवड्यापासून एसटी कर्मचारही आंदोलन करत आहे तर दुसरीकडे हे आंदोलन स्थगित करावे अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. आता या आंदोलनात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली आहे.या पार्श्वभुमीवर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून जनमताचा रेटा तयार करावा. तसे केल्यास सरकार घाबरून तुमच्या मागण्या मान्य करेल, असं आवाहन त्यांनी एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाशी बोलताना केले आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करीन. मागील १७ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अहिंसेच्या मार्गाने सुरू ठेवा. आंदोलनादरम्यान कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे आपणाकडून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी आंदोलकांनी घेतली पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पारनेर येथील एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाने अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न मांडले आहेत.
पुढे अण्णा हजारे म्हणाले, आंदोलनकर्ते व सरकार वेगळे नाहीत. त्यामुळे दोघांनाही एकमेकांचा विचार करायला पाहिजे. 38 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून देखील सरकारला जाग येत नसेल, तर लाखो लोकांनी एकाच वेळी बाहेर पडायला पाहिजे, तरच सरकारचे तोंड उघडेल व आपल्या मागण्या मान्य होतील. असं त्यांनी म्हटलं आहे.