माझा महाराष्ट्र अपघातात पहिला, दुसरा किंवा तिसरा काय, या यादीतच नसायला हवा. अपघात होऊ नये म्हणून नुसते प्रबोधन करण्यापेक्षा तशा सुविधाही लोकांना द्यायला हव्यात. झेब्रा क्रॉसिंग बरोबरच, सरकत्या जिन्यांचे फ्लाय ओव्हर ब्रिज उपलब्ध करायला हवेत. राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात यावीत, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या वेळी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशीष पुमार सिंह, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणपुमार उपाध्याय, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.
वाहन क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल्स येत आहेत. अधिक वेगाच्या गाडय़ा येत आहेत, त्या दृष्टीने माहिती देणे आणि जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात जनजागृतीसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, व्यक्तींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिले. वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱयांना सगळे नियम आणि शिस्त याची माहिती हवी. ती असेल तरच ते प्रशिक्षण देऊ शकतील. वाहतूक नियम, शिस्त यांचे पालन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘संयम’ आणि ‘नियम’ पाळले नाही तर यम येतो
रस्ते सुरक्षा हा जीवनशैलीचा भाग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, नियम आणि संयम या दोन्ही शब्दांत यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला तर यम भेटीला येतो. त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रस्ते फक्त माणसेच क्रॉस करत नाहीत तर प्राणीही करतात. त्यांचीही काळजी घ्यायला हवी असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न – अनिल परब
‘सडक सुरक्षा- जीवन रक्षा’ हे या वर्षीच्या अभियानाचे स्लोगन असून हे अभियान या वेळी पहिल्यांदाच 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 पर्यंत महिनाभरासाठी सुरू राहणार आहे. या वर्षी जवळपास 24 हजारांच्या आसपास अपघात झाले असून आधीच्या वर्षीच्या तुलनेत त्यात 23 टक्के घट झाली आहे तर मृत्यूही 10 टक्क्यांनी घटले आहेत. मृत्यूचे हे प्रमाणही कमी नाही. ते आणखी कमी करण्यासाठी विविध उपक्रमातून वाहतूक नियमांची जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही परिवहन मंत्री अनिल परब या वेळी म्हणाले.