संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर -वाचा संपूर्ण वेळापत्रक

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर -वाचा संपूर्ण वेळापत्रक

तिथीची वृध्दी झाल्याने यंदा पालखी सोहळ्याचा लोणंद मध्ये अडीच तर फलटण मध्ये दोन दिवस मुक्काम

दिंडीक-यांना मिळणार संस्थानच्या सही शिक्क्याने वाहन पास

पंढरपूर / सूर्यकांत भिसे – गेल्या दोन वर्षातील कोरोनाच्या महामारीनंतर यंदा प्रथमच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढी पायी वारीसाठी मंगळवार दि . २१ जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल . यंदा पालखी सोहळ्यात तिथीची वृध्दी झाल्याने लोणंद मध्ये अडीच दिवस तर फलटण मध्ये दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहील . दिंडीक-यांच्या मागणी नुसार यंदापासून संस्थानच्या सही शिक्क्याने वाहन पास दिले जातील अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांनी दिली .


श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे , प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई , विश्वस्थ डॉ अभय टिळक , ह भ प नामदेव महाराज वासकर , राणू महाराज वासकर , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर , दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी , सचिव मारुती कोकाटे , बाळासाहेब रंदवे , भागवत चवरे , भाऊ फुरसुंगीकर , सोपानकाका टेंबुकर , गुरुजीबुवा राशिनकर , शरद गायकवाड , बाळासाहेब उकळीकर , एकनाथ हांडे , दिनकर वांजळे , राजाभाऊ थोरात , बाळासाहेब वांजळे , व्यवस्थापक माऊली वीर , सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडी प्रमुख व फडकरी उपस्थित होते .

आषाढी पायी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम
मंगळवार दि . २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवेल . बुधवार दि २२ व गुरुवार दि २३ रोजी पुणे , शुक्रवार दिं २४ व शनिवार दि . २५ रोजी सासवड , रविवार दि . २६ रोजी जेजुरी , सोमवार दि . २७ रोजी वाल्हे , मंगळवार दि . २८ व बुधवार दि . २९ रोजी लोणंद , गुरुवार दि . ३० रोजी तरडगांव , शुक्रवार दि . १ व शनिवार दि . २ जुलै रोजी फलटण , रविवार दि . ३ रोजी बरड , सोमवार दि . ४ रोजी नातेपुते , मंगळवार दि . ५ रोजी माळशिरस , बुधवार दि . ६ रोजी वेळापूर , गुरुवार दि . ७ रोजी भंडीशेगाव , शुक्रवार दि . ८ रोजी वाखरी तर शनिवार दि . ९ रोजी श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी सोहळा पोहोचेल . रविवार दि . १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे . पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब , बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे ( सदशिवनगर ) , पानीव पाटी , ठाकुरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे .

दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी म्हणाले , पालखी सोहळ्यातील अवांतर गर्दी कमी करण्यासाठी ज्यांच्याकडे पास नाही अशी वाहने वारीत सोडू नयेत . याबाबत पोलिसांना माहिती द्यावी . वाहनांना पास देताना पुर्वी दिंडीक-यांची अडवणूक होत होती . ती अडवणूक थांबविण्यासाठी वाहनांचे पास हे संस्थानच्या सहीने द्यावेत अशी मागणी त्यांनी केली . त्यास सर्व दिंडीप्रमुखांनी टाळ्यांच्या गजरात पाठींबा दिला .

दिंडी सोहळ्याचे सचिव मारुती कोकाटे म्हणाले , संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम सोहळ्यापुर्वी पूर्ण व्हावे . सासवड येथील पुलाच्या कामासाठी ६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत . परंतु हे काम अद्याप सुरु नाही . जेजूरीला नवीन तळासाठी ९ एकर जागा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे . तीचा ताबा मिळावा . पालखी सोहळ्यापुर्वी पालखी तळ सुसज्ज व्हावेत .

राणू महाराज वासकर म्हणाले , आषाढी वारी नियोजनाची बैठक चैत्र शुध्द दशमीला दुपारी घ्यावी .

सोपानकाका टेंबुकर म्हणाले , रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक दिंड्यांच्या दुपारच्या जेवणाच्या व मुक्कामाच्या जागा बदलल्या आहेत . पोलिसांना माहिती नसते . ते गाड्या लावू देत नाहीत . त्यासाठी पोलिस प्रशासनाला माहिती द्यावी .

माऊली जळगावकर म्हणाले , राष्ट्रीय महामार्गावर रस्ता दुभाजक अखंड असल्याने पालखी सोहळ्याची वाहने उजवीकडून डावीकडे येण्यास अडचण निर्माण होणार आहे . त्यासाठी नियोजन व्हावे . पालखी महामार्गावरील मद्यपानाची दुकाने रस्त्यापासून ५०० ते ७०० मिटर अंतर दूरवर असावीत . पालखी तळासाठी २५ एकर जागा आरक्षित ठेवावी .

भाऊ फुरसुंगीकर म्हणाले , कुंभमेळ्याच्या धर्तीवर पालखी तळासाठी जागा आरक्षित ठेवावी . माळशिरसला गंगूकाका शिरवळकर यांची समाधी गायब झाली आहे तर वेळापुरचा धावाच नष्ट झाला आहे . वेळापूर येथील मानाच्या भारुडासाठी जागा उपलब्ध करावी .

 

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथापुढे २७ तर रथामागे २५१ दिंड्या नोंदणीकृत आहेत . तसेच नोंदणी नसलेल्या १२५ ते १५० दिंड्या आहेत . सोहळ्यातील या दिंड्यांना वाहन पास दिले जातील . वाहन पासाचा गैरवापर टाळण्यासाठी नोंदणीकृत दिंडी चालकाने १५ मे पर्यंत वाहनांचे नंबर , वाहन चालकाचे नांव व मोबाईल नंबर संस्थानकडे द्यावेत . यंदा माऊली सोबत सुमारे पाच लाख समाज राहिल . त्यादृष्टीने पालखी तळ , आरोग्य , पाणी , वीज , रस्ता व सुरक्षा याबाबत शासनाकडे योग्य तो पाठपुरावा केला जाईल .
ॲड . विकास ढगे पाटील
पालखी सोहळा प्रमुख

माऊलींच्या सोहळ्याला मोठी परंपरा आहे . अनेकांना वाटते माझ्यामुळे सोहळा चालतो . परंतु असे काही नाही . माऊली आहे म्हणून आपल्याला किंमत आहे . माऊली पेक्षा कोणीही मोठा नाही . पोलिस प्रशासन व सरकारी यंत्रणा त्यांचे योग्य पध्दतीने काम करत असते . दिंडीक-यांनी त्यांना सहकार्य करावे .
श्रीमंत उर्जितसिंह शितोळे
पालखी सोहळ्याचे मानकरी

ग्लोबल न्युज नेटवर्क: