पुणे: ऑक्सफर्ड विद्यापीठाची प्रयोगशाळा , पुण्याची सीरम कंपनी आणि अँस्ट्राझेनेका संयुक्तपणे कोरोनावर मात करण्यासाठी लशीची निर्मिती करत आहेत. या लशीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या पुण्यात सुरू झाल्या.
सीरमच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या सुरू
पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये निवडक व्यक्तींना लस देण्यात आली. ज्यांना कोरोनाची लस दिली आहे त्यांच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर मुरलीधर तांबे यांनी ही माहिती दिली. प्रयोग यशस्वी झाले तर २०२१च्या पहिल्या तिमाहीत लस बाजारात येण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात लशीचे १०० मिलियन डोस तयार करण्याची योजना तयार आहे. या लशीची अंदाजे किंमत ३ ते ४ डॉलर असेल. भारतीय चलनात २०० ते ३०० रुपयांत लस उपलब्ध होईल. सरकारकडून सवलत मिळाल्यास लशीची किंमत आणखी कमी होऊ शकते, अशी माहिती सीरमच्या व्यवस्थापनाने दिली.
सीरमच्या लशीची दुसऱ्या टप्प्यात भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि पुण्यातील केईएम हॉस्पिटल या ठिकाणी चाचणी झाली. भारतातील प्रयोगांचे निष्कर्ष उत्साह वाढवत होते. मात्र युरोपमध्ये सुरू असलेल्या प्रयोगांदरम्यान एका व्यक्तीची तब्येत लस घेतल्यानंतर बिघडली. हा लशीचा दुष्परिणाम आहे की संबंधित व्यक्तीला दुसऱ्या कारणामुळे त्रास झाला आहे याची तपासणी करण्यासाठी लशीचे जगभरातील प्रयोग तात्पुरते थांबवण्यात आले. मात्र लशीचा दुष्परिणाम झालेला नाही ही बाब लक्षात येताच पुन्हा जगभर प्रयोग सुरू करण्यात आले. यानंतर महाराष्ट्रात पुढच्या टप्प्याच्या प्रयोगांचा निर्णय झाला.
भारती रुग्णालयाच्या डॉ. सोनाली पालकर म्हणाल्या, ‘ज्या स्वयंसेवकांना यापूर्वी करोना झालेला नसेल, अशा स्वयंसेवकांना लशीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. स्वयंसेवकांना दोन डोस दिले जातील. दुसरा डोस २८ दिवसांनी दिला जाईल. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीदरम्यान दिलेल्या लशीला आता २८ दिवस होत आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील स्वयंसेवकांनादेखील लशीच्या दुसऱ्या डोससाठी बोलाविण्यात येणार आहे.’
दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील स्वयंसेवकांना लस दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची नोंद ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील स्वयंसेवकांचे दोन्ही डोस पूर्ण झाल्यानंतर एका महिन्याने त्यांची पुन्हा अँटिबॉडीची चाचणी करण्यात येईल. त्या चाचणीत स्वयंसेवकांच्या रक्तात अँटिबॉडी निर्माण झाल्याचे आढळल्यास तिसऱ्या टप्प्यात लस परिणामकारक असल्याचे सिद्ध होईल.
जागतिक लस निर्मिती क्षेत्रात सीरम ही एक मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. अनेक गंभीर आजारांवरील लशींची निर्मिती सीरममध्ये होते. याच कारणामुळे सीरम ज्या प्रयोगात सहभागी आहे त्या कोरोनावर मात करण्यासाठीच्या लस निर्मिती प्रयोगाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सध्या या लशीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मानवी चाचण्या सुरू आहेत.
भारताचा कोरोना रिकव्हरीचा रेट ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत लस आल्यास संकटावर मात करणे आणखी सोपे होईल, अशी आशा आहे. सध्या भारत बायोटेक आणि सीरमसह देशातील सात कंपन्या कोरोनावर मात करण्यासाठी लस तयार करण्याकरिता संशोधन करत आहेत. प्रत्येक संस्थेचे संशोधन वेगवेगळ्या टप्प्यावर असले तरी प्रगतीपथावर आहे.
भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड , आयसीएमआर ( एनआयव्ही आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालय (भारत सरकार) संयुक्तपणे कोव्हॅक्सिन विकसित करत आहेत. या लशीच्या प्रयोगासाठी केंद्रीय सशस्त्र बल मेडिकल कॉलेजमध्ये २० माकडांवर प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. माकडांच्या शरीरात कोरोनावर मात करण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या. लशीच्या बाबतीत भारतात सुरू असलेल्या प्रयोगांचे चित्र आशादायी असल्यामुळे लवकरच कोरोनावर मात करणारी लस हाती येईल अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.