दिलासादायक : राज्यात करोनाबाधित रुग्णांमध्ये मोठी घसरण ,३१ हजार १११ नवीन रुग्णांचं निदान

दिलासादायक : राज्यात करोनाबाधित रुग्णांमध्ये मोठी घसरण ,३१ हजार १११ नवीन रुग्णांचं निदान

आज २९ हजार ०९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबई : राज्यातील करोना रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून ४० हजारांच्या आसपास स्थिरावल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र आज राज्यात करोनाबाधित रुग्णांमध्ये मोठी घसरण झाली असून ३१ हजार १११ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. तसंच २४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आज २९ हजार ०९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६८,२९,९९२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.३ टक्के एवढं झालं आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५ टक्के एवढा आहे.

 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,२१,२४,८२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७२,४२,९२१ (१०.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २२,६४,२१७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २ हजार ९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज किती ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले?

करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना राज्यात आज १२२ओमिक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८१ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि ४१ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने रिपोर्ट केले आहेत. यामध्ये पुणे शहरातील ४०, मीरा भाईंदरमधील २९, नागपूरमधील २६, औरंगाबादमधील १४, अमरावतीमधील ७, मुंबईतील ३ आणि भंडारा, ठाणे मनपा आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, आजपर्यंत राज्यात एकूण १८६० ओमिक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: