राज्यसभेच्या निवडणुका जूनमध्ये होणार आहेत त्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे आहे त्यात शिवसेनेने आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे. तर महाराष्ट्र विधानसभेतील सध्याच्या आमदारांचे संख्याबळ लक्षात घेता, राज्यसभेसाठी भाजप तिसरी जागा लढण्याची शक्यता असल्याचा माहिती सूत्रांनी दिली आहे.
आता यावरूनच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन सहाव्या जागेवरुन विरोधकांवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, “राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरु करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार! हे दुष्टचक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे.
महापालिका निवडणुकीआधी राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यात राज्यातील बदललेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे 2, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी होईल. तर, सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे आहे त्यात शिवसेनेने आधीच सहाव्या जागेवर दावा केला आहे.