राज्यातील 147 बाजार समित्यांसाठी मतदान; दिग्गज नेत्यांच्या वाढल्या चिंता

 

कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील एकूण 253 बाजार समित्यांपैकी 18 बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.तर 147 बाजार समित्यांसाठी आज निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या तीस एप्रिलला लागणार आहे. बाजार समित्यांमध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असंच चित्र आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विखेंची प्रतिष्ठा पणाला आगामी विधानसभा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अहमदनगरमध्ये आज 14 पैकी 7 बाजारसमित्यांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज मतदान होणार आहे. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तसेच जिल्ह्यात धरणगाव व पाचोरा वगळता भाजप शिवसेना युती व महाविकास आघाडीत चुरस आहे तर धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने भाजप शिवसेना राष्ट्रवादीचा एक गट विरुद्ध महाविकास आघाडी लढत पाहायला मिळणार आहे. तर पाचोरा येथे भाजपमध्ये फूट पडल्याने भाजप, शिवसेना विरूद्ध महाविकास आघाडी व भाजपच्या स्वतंत्र पॅनलमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

 

 

Team Global News Marathi: