मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या तासाभराच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. मात्र, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक झालेल्या या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी पहिल्यांदाच गणपती बसणार आहेत. त्यामुळे गणपती दर्शनासाठी सहकुटुंब यावं म्हणून फडणवीस यांना आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे सागरवर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी राज्याची राजकीय परिस्थिती आणि मुंबई-ठाण्यासह राज्यातील इतर महापालिका निवडणुकीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
राज ठाकरे आज सकाळी 8 वाजता सागर बंगल्यावर आले होते. त्याची गंधवार्ता कुणालाही नव्हती. राज ठाकरे यांनी अचानक ही भेट घेऊन सर्वांनाच बुचकळ्यात पाडलं आहे. गणपती दर्शनाला घरी येण्याचं आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे फडणवीसांच्या निवासस्थानी आल्याचं सांगितलं जातं. पण या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.