यंदा पावसाचे प्रमाण सर्वसाधारण, देशात परकीयांचा त्रास वाढणार; वाचा सविस्तर भेंडवळचे भाकीत
बुलडाणा : ‘घटमांडणी’तून वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकीत केले जाते. गेल्या ३५० वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला ही परंपरा जोपासली जाते, असा दावा बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील ( bhendwal bhavishyavani 2022 ) शेतकरी करतात. भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे ( bhendwal chi bhavishyavani ) संपूर्ण राज्याचं खासकरून शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं असतं. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी निरीक्षणे करून यंदाचा अंदाज जाहीर केला.
भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार या वर्षी पावसाळा सर्वसाधारण (Rain forecast) राहणार असून, पावसाळ्याचा पहिल्या महिन्यात सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसऱ्या महिन्यात कमी पावसाची शक्यता आहे, तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात भरपूर पाऊस असेल असे भाकित पावसासबंधी वर्तवण्यात आले आहे. दरम्यान यंदा अवकाळी पवासाची (Untimely rain) शक्यता देखील अधिक असल्याचे या भविष्यवाणीमध्ये म्हटले आहे.
यंदा पिकांचे प्रमाण सर्वसाधारण राहणार असून, पिकाच्या नासा़डीचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे भेंडवळच्या भविष्यवाणीत सांगण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे यंदा देशात रोगराईचे प्रमाण कमी राहणार असल्याचे म्हटले आहे.
पिकांसाठी पोषक वातावरण
देशात चालू वर्ष परिस्थिती कशी राहणार आहे, याबाबत बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ या गावात दरवर्षी अंदाज वर्तवण्यात येतो. भेंडवळची ही भविष्यवाणी राज्यभरात प्रसिद्ध आहे. चालू वर्षी देशात आर्थिक, सामाजिक, राजकीय तसेच आरोग्य परिस्थिती कशी राहणार याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंजानुसार यंदा देशात पावसाचे प्रमाम सर्वसाधारण राहणार असून, शेवटच्या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. पिकांचे प्रमाण चांगले राहील मात्र नासाडीची शक्यता देखीव वर्तवण्यात आली आहे.
देशावर परकीय आणि आर्थिक संकट
पुढे या भविष्यवणीत म्हटले आहे की, देशाला यंदा आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. सोबतच परकीय सत्तांचा त्रास वाढले. मात्र देशाचा संरक्षण विभाग या सर्व गोष्टींना समर्थपणे तोंड देईल. गेल्या दोन-तीन वर्षांपासून देश कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आहे. मात्र यंदा देशात रोगराईचे प्रमाण कमी राहणार असल्याचे दिलासादायक भाकीत वर्तवण्यात आले आहे.