शिवसेनेला धक्का: मिलिंद नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीस यांची झाली भेट ?

शिवसेनेला धक्का: मिलिंद नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीस यांची झाली भेट ?

मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सरकारला सुरुंग लागला. शिवसेनेतील बंडाळीमुळे ठाकरे सरकार कोसळून शिंदे सरकार सत्तेवर येताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नक्की घडतय काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

दहा दिवसांच्या सत्ता संघर्षात शिवसेनेचे अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने एकत्रित येत सत्ता स्थापन केली. भाजपने शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लावली. सोमवारी शिंदे सरकारने विश्वास दर्शक ठराव बहुमताने जिंकला. मुख्यमंत्री शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी करत गेल्या दहा दिवसांमधील राजकीय घडामोडी कथन केल्या. पक्ष नेतृत्वाने आत्मपरीक्षण करायला हवे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

अभिनंदनाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलत असताना विधानसभेत प्रेक्षक गॅलरीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात दीर्घकाळ चर्चा सुरू असल्याचे दिसून आले. विधानभवनाच्या आवारातही श्रीकांत शिंदे आणि मिलिंद नार्वेकर एकत्र वावरताना दिसले. यामुळे अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या आहेत.

 

शिवसेनेत बंडाळी निर्माण झाल्यानंतर सचिव मिलिंद नार्वेकर फारसे सक्रिय नाहीत. परंतु, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आल्याची माहिती समोर आली. धनंजय मुंडे यांनी ही बाब विधानसभेत सांगितली.

 

सोमवारी राज्य विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात नार्वेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीने चर्चेला विधान होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि नार्वेकर यांची रात्री उशिरा भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

या भेटी मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, यातून राज्याच्या राजकारणात आणकी मोठे काहीतरी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आणखी काय घडणार – एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत फार मोठी उलथापालथ झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून राज्याची सत्ता तर गेली आहेच, त्याशिवाय शिवसेनेलाही मोठे खिंडार पडले आहे.

 

एकनाथ शिंदे यांचे अभिननंदन ठरावाला उत्तराचे भाषण आणि गुलाबराव पाटील यांचे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंच्या भोवती असलेल्या चार नेत्यांमुळे शिवसेना पोखरली जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरही राजकीय वर्तुळात खलबते सुरू झाली आहेत.

 

त्यातच या सत्ताबदलाच्या काळात मिलिंद नार्वेकर कोणाच्याही दृष्टीस पडले नव्हते. ते थेट शपथविधीच्या वेळी प्रेक्षक गॅलरीत श्रीकांत शिंदे यांच्यासोबत दिसले. त्यानंतर आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्याची बातमी येऊन धडकली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर निश्चितच आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: