मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर तो हळूहळू तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दिशेने सरकला. याचा परिणाम म्हणजे राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाली तर काही भागांत जोरदार पाऊस झाला. यापावसामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील काही भागांत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली.
पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा आढावा आणि माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवश्यक ती मदत पुरवण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्वीट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर चर्चा केल्यावर त्यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यातील काही भागात पूर आणि मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा केली. या पुरामुळे बाधित झालेल्या बंधू आणि भगिनींबाबत माझ्या संवेदना. सध्या सुरू असलेल्या मदत कार्यात केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत पुरवली जाईल.”
तातडीने पंचनामे करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (१६ ऑक्टोबर २०२०) कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे गाफील राहू नका. नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा. पूर आणि अतिवृष्टीने शेतपिके आणि मालमत्तेचे जे नुकसान झाले आहे त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी. दुर्दैवाने यात जे नागरिक मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.